म. टा. प्रतिनिधी, ठाणे

ठाणे चेकनाक्यावरील वाहतूककोंडीला आवर घालण्याकडे सर्वांचे लक्ष गेले असतानाच, ठाण्यातील आतल्या रस्त्यांमध्ये मात्र दुचाकीस्वार आणि मोटारीही एखाद्या राजकीय बंदप्रमाणेच पळवाटा शोधत बागडत होत्या. घोडबंदर, मुंबई-नाशिक महामार्ग अशा विविध मार्गांचे केंद्रस्थान असलेल्या माजीवडा जंक्शनवर पोलिस दिसत नसल्याने त्याचा फायदा घेऊन अनेक गाड्या रस्त्यावर उधळलेल्या दिसत होत्या.

बाळकूमपासून तीन हात नाका, मल्हार टॉकिजपर्यंत ठिकठिकाणी आतल्या रस्त्यांमध्ये तसेच चौकांवर बाइकस्वार दिसत होते. बाळकूम नाक्यावर काही पोलिस ट्रक व मोटारींना थांबवून त्यांची चौकशी करत होते. मात्र त्यांच्याच बाजूने इतर काही गाड्या निघून जात होत्या. माजीवडा जंक्शनवर मात्र पोलिस दिसत नव्हते. तीन हात नाका, हरीनिवास सर्कल, मल्हार टॉकिज या महत्त्वाच्या परिसरात मात्र अधूनमधून गाड्यांची वर्दळ सुरूच दिसत होती. रविवारी दिवसभर जनता कर्फ्यू पाळणाऱ्या ठाणेकरांमधील संचारबंदीचे गांभीर्य विरले कसे, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत होता.

…तर कठोर भूमिका हवी!

रस्त्यात काही ठिकाणी हातात मोबाइल घेऊन मग्न असलेले नागरिकही दृष्टीस पडत होते, तर काही जण उगाचच रस्त्यावर फेरफटका मारताना दिसत होते. त्यांना कोणीही हटकत नव्हते. प्रसारमाध्यमांसह अनेक स्तरांतून या करोनाबाबत जागृती होत असतानाही ठाणेकर त्याबाबत गंभीर नसल्याचे दिसत होते. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, त्यांनी स्वयंस्फूर्तीने घरातच थांबणे अपेक्षित आहे. मात्र त्यांना या परिस्थितीचे गांभीर्य नसेल, तर पोलिस यंत्रणेने कठोर भूमिका घ्यायला हवी, असे मत रहिवासी व्यक्त करत होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here