हायलाइट्स:
- ‘दहशतवादाचं प्रवेशद्वार’ आणि ‘समाजासाठी धोका’
- सौदी अरेबिया सरकारचा सुन्नी संघटनेविरुद्ध महत्त्वाचा निर्णय
- जनतेपर्यंत सूचना पोहचवण्यासाठी मौलवी आणि मशिदींना निर्देश
करोना संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात ‘मरकझ‘ प्रकरणामुळे ‘तबलिगी जमात’ भारतात वादग्रस्त ठरली होती. याच तबलिगी जमात संघटनेवर सौदी अरेबिया सरकारनं बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केलाय.
सुन्नी मुस्लिमांची सर्वात मोठी संघटना म्हणून ‘तबलिगी जमात’ ओळखली जाते. मात्र, ‘दहशतवादाच्या प्रवेशद्वारांपैंकी एक’ आणि ‘समाजासाठी धोकादायक’ असा ठपका ठेवत सौदी अरेबियानं या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय.
जगातील मुस्लीम देशांत ‘दादा’ ठरलेल्या सौदी अरेबियानं घातलेल्या या बंदीननंतर ‘तबलिगी जमात’वर मोठा आणि दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
सौदीच्या इस्लामिक व्यवहार मंत्रालयानं मशिदींना याविषयी लोकांपर्यंत माहिती पोहचवण्याचे निर्देश दिले. शुक्रवारच्या नमाजानंतर अशा संघटनांमध्ये सामील होण्यापासून सावध राहण्याचा इशारा मशिदींतून देण्यात आला.
देशाचे इस्लामिक व्यवहार मंत्री डॉ. अब्दुललतीफ अल – अलशेक यांनी सोशल मीडियाच्या सहाय्यानं ‘तबलिगी जमात’वर बंदी घालण्याची घोषणा केली. सुन्नी इस्लामी संघटना ‘दहशतवादाचं प्रवेशद्वार’ आणि ‘समाजासाठी धोका’ असल्याचं त्यांनी म्हटलं. .
सौदीच्या धार्मिक व्यवहार मंत्रालयानं मशीद आणि मौलवींना दिलेल्या निर्देशानुसार, शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर चर्चेत या विषयांचा समावेश करावा…
– तलबिगी जमात लोकांचा ब्रेनवॉश करून लोकांना मुख्यत्वे तरुणांना दहशतवादाच्या जाळ्यात ओढतात
– या संघटनेच्या सर्वात महत्त्वाच्या चुकांचा उल्लेख करण्यात यावा
– ही संघटना जनतेसाठी धोकादायक आहे, हे त्यांच्यापर्यंत पोहचवा
– सौदी अरेबियात ‘तबलिगी’सह इतर धोकादायक गटांशी संबंध ठेवणं बेकायदेशीर आहे हेदेखील जनेताला सांगावं
काय आहे ‘तबलिगी जमात’?
सुमारे १०० वर्षांपूर्वी देवबंदी इस्लामिक विद्वान मौलाना मोहम्मद इलियास कांधलवी यांनी ‘धार्मिक सुधारणा चळवळ’ तबलिगी जमात ही संघटना सुरू केली होती. ‘तबलिगी जमात’ विशेषत: इस्लामच्या अनुयायांना धार्मिक प्रवचन देण्याचं काम करत होती.
पूर्णपणे गैर-राजकीय असलेल्या या संघटनेचा उद्देश हा केवळ ‘इस्लामची पाच मूलभूत तत्त्वे समजावून सांगणं’ असाच होता. अरकान (सिद्धांत), कलमा, नमाज, इल्म-ओ-जिक्र (ज्ञान), इकराम-ए-मुस्लीम (मुस्लिमांचा आदर), इखलास-एन-नीयत (योग्य हेतू) आणि तफरीग-ए-वक्त (मेजवानी आणि तबलीगसाठी वेळ काढणे) अशी ही धार्मिक तत्त्वं होती. आता मात्र, ही संघटना कट्टरतावादी आणि दहशतवादी कृत्यांसाठी ओळखली जातेय.
भारतात ‘तबलिघी’ वाद!
भारतात कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीला ‘तबलीगी जमात’च्या दिल्लीतील मरकझ प्रकरण समोर आल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. मात्र, तबलिघी जमात प्रकरणी करण्यात आलेल्या वृत्तांकनाला आणि बातम्यांना धार्मिक रंग फासण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी महत्त्वाची टिप्पणीही यापूर्वी भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी केली होती.