हायलाइट्स:
- शरद पवारांवर टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्युत्तर
- देवेंद्र फडणवीस टीका करतात, त्यावेळी चमत्कार घडतो- मलिक
- २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू: नवाब मलिक
- अमृत पिऊन कुणी सत्तेत बसत नाही हे देवेंद्र फडणवीसांना कळायला हवं- मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा देताना, त्यांना पंतप्रधानपदावरून टोला लगावला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहत आहेत. पण स्वप्न पाहायला कुणालाही बंदी नाही. त्यांचा पक्ष दहा खासदारांच्या संख्येच्या पलीकडे जाऊ शकला नाही. त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता. फडणवीस यांच्या टीकेला आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस टीका करतात, तेव्हा चमत्कार घडतो, असं मलिक म्हणाले.
जेव्हा देवेंद्र फडणवीस तुम्ही शाळेत होतात, त्यावेळी १९८४ साली लोकसभेच्या निवडणुकीत भाजपची संख्या दोनवर गेली होती. तुमचे खासदार डबलसीट सायकलवरून संसदेत जात होते हे विसरला आहात, असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. ही लोकशाही आहे. अमृत पिऊन कुणी सत्तेत बसत नाही हे देवेंद्र फडणवीस तुम्हाला कळलं पाहिजे, असेही मलिक म्हणाले. शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने ते पंतप्रधान होतील, असा कुठलाही दावा केलेला नाही. उलट पवार हे देशातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र करण्यासाठी काम करत आहेत. विरोधकांच्या एकीमुळे मोदी सरकार सत्तेबाहेर जाईल, असेही नवाब मलिक म्हणाले.