हायलाइट्स:
- रत्नागिरी गॅस आणि वीज निर्मिती प्रकल्प अडचणीत
- अपुरा गॅस पुरवठा आणि अपुरी वीज निर्मिती यामुळे संकट
- आरजीपीपीएल प्रकल्पाचे भवितव्य अंधारात
- सहाशे स्थानिक कुटुंबांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती
देशातील विविध प्रकल्पांमध्ये उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायूचा वापर हा प्रामुख्याने खतनिर्मिती, घरगुती गॅस आणि वाहनांसाठी इंधन म्हणून केला जातो. त्यामुळे प्रतिदिन १९६४ मेगावॉट वीजनिर्मितीसाठी आवश्यक ८.५ एमएमएससीएमडी गॅस आरजीपीपीएलला मिळत नाही. भारतीय रेल्वेला ५०० मेगावॉट वीज देण्यासाठी आवश्यक गॅसही उपलब्ध होत नसल्याने, सध्या RGPPL अन्य मार्गांनी हा करार पूर्ण करत आहे. मार्च २०२२ मध्ये हा करार संपल्यावर आरजीपीपीएलकडे वीजेचा खरेदीदारच नाही. वीज उत्पादन होत नसल्याने कंपनीचे भवितव्य अंधारात आहे, असे बोलले जात आहे.
गुहागरमधील हा प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा आहे. गॅस तसेच वाफेवर टर्बाइन चालवण्याचे तंत्र असलेला हा एकमेव प्रकल्प आहे. रेन हार्वेस्टिंगच्या पाण्यावर हा प्रकल्प चालवला जातोय. असा प्रकल्प बंद होणे म्हणजे देशाचे नुकसान असून, आजच्या घडीला या प्रकल्पामध्ये गुहागर परिसरातील जवळपास सहाशे स्थानिक कामगार आहेत. हा प्रकल्प जर बंद पडला तर, या कामगारांवर अवलंबून असलेली सहाशे कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय या प्रकल्पात वाहने पुरवणारे, बांधकाम करणारे आणि स्वच्छतेची कामे करणाऱ्या कंत्राटदारांचे व्यवसायही बंद होतील. त्यामुळे स्थानिकांना मोठी आर्थिक झळ बसेल, असे सांगितले जात आहे.
देशातील सर्वात मोठा, पर्यावरणपूरक आणि प्रदूषणविरहीत वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असणे गरजेचे आहे. केंद्र आणि राज्य सरकारबरोबरच कोकणातील लोकप्रतिनिधी यासाठी पुढाकार घेतील, अशी आम्हाला आशा आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालला तर, रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळू शकेल, अशी प्रतिक्रिया आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता यांनी दिली.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times