हायलाइट्स:
- नागपूर आणि अकोला-वाशिम विधानपरिषद मतदारसंघाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला
- या दोन्ही जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवत महाविकासआघाडीला धक्का दिला आहे
नागपूर आणि अकोला-वाशिम विधानपरिषद मतदारसंघाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या दोन्ही जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवत महाविकासआघाडीला धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात राज्य सरकार कारभार करण्यात अपयशी ठरले आहे. अकोला आणि नागपूर विधानपरिषद निवडणुकीच्यानिमित्ताने जनतेने हे दाखवून दिले. नागपूरमध्ये काँग्रेसची 40 ते 45 मते फुटली. नागपूरमध्ये भाजपचा जवळपास 176 तर अकोल्यात 186 मतांनी विजय झाला. ग्रामपंचायत निवडणुकांपासून राज्यात भाजपचा अश्वमेध घोडदौड करत असल्याचे दरेकर यांनी म्हटले.
यापूर्वी नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचा पराभव झाला तेव्हा अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. मात्र, विधानपरिषदेच्या ताज्या निकालांनी भाजप पक्ष एकसंध असल्याचे दाखवून दिले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या होमपीचवर काँग्रेसला विजयी करु शकले नाहीत. त्यांचा कारभार एककल्ली होता. त्यांनी पक्षावर दबाव आणून दोन उमेदवार बदलायला लावले. याचे पडसाद निवडणुकीत उमटले. या सगळ्याची जबाबादारी घेऊन नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत असेल तर त्यामध्ये काहीही चूक नाही. ज्यांना अकोला आणि नागपूर विधानपरिषदेच्या जागेवर विजय मिळवता आले नाही, ते भविष्यात राज्याचे नेतृत्त्व काय करणार, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.
अकोल्यात भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल हे ४४३ मते घेऊन विजय झालेले आहेत. तर नागपूरमध्ये भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या मंगेश देशमुख यांचा 176 मतांनी पराभव केला. नागपूरमध्ये भाजपकडे 318 मते होती. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपला 362 मते मिळाली. त्यामुळे काँग्रेसची 44 मते फुटल्याचे स्पष्ट झाले.