हायलाइट्स:
- महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक निकाल
- नागपूर, अकोला येथून भाजपचे उमेदवार विजयी
- निवडणूक निकालानंतर भाजपचा खळबळजनक दावा
- महाविकास आघाडीची ९६ मते फुटली- आशिष शेलार
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर आणि अकोला स्थानिक स्वराज्य मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणूक निकालानंतर भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर आणि अकोला मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ९६ मते फुटल्याचा दावा त्यांनी केला आहे. तिघांच्या विरोधात लढून भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे, असे ते म्हणाले.
मुंबई, धुळ्यात उमेदवारी मागे घेतली नसती तर, असंच नाक कापलं असतं, असा टोला शेलार यांनी लगावला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्याक्षांना त्यांनी ‘विनोदवीर’ असे संबोधले आहे. तर त्यांचं हास्यजत्रेपेक्षा मोठं हसं झालंय, अशी खिल्लीही उडवली. तसेच या निवडणूक निकालानंतर आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केले.
नागपुरात बावनकुळे विजयी
महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नागपूर मतदारसंघातून भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (चंद्रशेखर ओहकुळे) यांनी विजय मिळवला आहे. नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक मतमोजणीत ५४९ मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. पहिल्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, रवींद्र भोयर यांना १, मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली. अकोलामध्ये भाजपचे वसंत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. वसंत खंडेलवाल यांना ४४३ मते मिळाली. शिवसेनेचे तथा महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया हे चौथ्यांदा या निवडणुकीत उभे होते. मात्र, ते विजयाचा चौकार मारू शकले नाहीत. जवळपास १०९ मतांनी ते या निवडणुकीत पराभूत झाले.