हायलाइट्स:
- काँग्रेसने येत्या 28 डिसेंबरला शिवाजी पार्कवर राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मेळावा घ्यायची योजना आखली होती
- राज्य सरकारने करोनाच्या कारणामुळे या सभेला परवानगी नाकारली
- काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांनी उच्च न्यायालयात राज्य सरकारविरोधात याचिका दाखल केली होती
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्ष सहभागी असताना मुंबई काँग्रेस अध्यक्षाने स्वपक्षीय सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्याबद्दल राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. शिवसेना नेतृत्वाने ही बाब काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर दिल्लीतून भाई जगताप यांच्या कृतीबद्दल तीव्र नापसंती दर्शवण्यात आली. त्यामुळे भाई जगताप यांनी उच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली होती.
त्यानंतर भाई जगताप यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवादही साधला होता. ज्यावर ओमायक्रॉनचे संकट आहे. त्यामुळे मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. राज्य सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत. त्याचं पालन करतच काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा केला जाईल. काँग्रेसचा नियोजित स्थापना दिवस मुंबईच्या तेजपाल ऑडिटोरियममध्ये घेण्यात येईल. राहुल गांधी यांच्या मेळाव्याची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असे भाई जगताप यांनी म्हटले होते.
राज्यातील महाविकास आघाडीचा काँग्रेसचा हा महत्वाचा घटक पक्ष असला तरी आघाडीत फार काही आलबेल असल्याचे बोललं जात होते. मात्र, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर काँग्रेसची शिवसेनेशी जवळीक वाढल्याचे चित्र निर्माण झाले. त्यानंतर काँग्रेसच्या सभेला शिवाजी पार्क मैदानात परवानगी मिळेल, अशी आशाही निर्माण झाली होती. मात्र, मुंबईत ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर राज्य सरकार कमालीचे सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर अजूनही राज्य सरकारने काँग्रेसच्या सभेला परवानगी न दिल्याने भाई जगताप यांनी शेवटी न्यायालयात जाण्याचा मार्ग निवडला होता.