हायलाइट्स:
- रत्नागिरीतील खंडाळा परिसरात भीषण अपघात
- भरधाव बल्करची दुचाकीला जोरदार धडक
- दुचाकीवर मागे बसलेला १० वर्षीय मुलाचा मृत्यू
- ग्रामस्थ आक्रमक, बल्कर चालकाला पोलिसांनी केली अटक
रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथे बुधवारी संध्याकाळी हा अपघात झाला. बल्कर आणि दुचाकीचा अपघात झाला. हा अपघात भयंकर होता. त्यात दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हा मुलगा दुचाकीवर मागे बसला होता. तर दुचाकी चालक या अपघातात जखमी झाला आहे. दर्शिल सावंत ( वय १०) असे मृत मुलाचे नाव आहे. भरधाव बल्करने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यावेळी दर्शिल हा दुचाकीवर मागे बसला होता. बल्करच्या धडकेनंतर दुचाकीवर मागे बसलेला मुलगा रस्त्यावर पडला. यात त्याचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालवणारे त्याचे आजोबा रामचंद्र सावंत हे जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर पोलिसांनी बल्कर चालक चंदन कुमार सिद्धू बिंद (वय ३६, मूळ राहणार उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जयगड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान या घटनेनंतर काल रात्री स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले होते. अपर पोलीस अधीक्षक गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
स्थानिक ग्रामस्थांचा रास्तारोको
या घटनेनंतर अवजड वाहतुकीला विरोध करत स्थानिकांनी काहीकाळ रस्तारोको केला होता. कोळीसरे परिसरातील माजी सैनिक म्हणून ओळख असलेले आर डी तथा रामचंद्र देमाजी सावंत हे आपल्या दुचाकीवरून खंडाळा परिसरात खासगी कामानिमित्ताने निघाले होते. याचवेळी महावितरणच्या कार्यालयासमोर बल्करने पाठीमागून दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर मागे बसलेला नातू दर्शिल याचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी एकत्र येत रास्तारोको केला. अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्याची विनंती केली. यापुढे एकही अवजड वाहन सोडू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला होता. तत्पूर्वी या घटनेची जयगड पोलिसांत नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times