हायलाइट्स:
- विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एसटीचे कर्मचारी अद्याप ठाम
- परिवहन मंत्री अनिल परब रत्नागिरीत
- अवघ्या १०० मीटरवर एसटी आंदोलक
- परब यांच्या सुरक्षेत वाढ, पोलीस अधिकाऱ्यांसहीत कर्मचारी तैनात
राज्यात विविध मुद्द्यांवर कर्मचाऱ्यांनी एसटी संपाचे हत्यार उपसले आहे. महिनाभरापेक्षा अधिक कालावधी या संपाला लोटला आहे. मात्र अद्याप ठोस मार्ग निघालेला नाही. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासंदर्भात मुदत दिली होती. मात्र मुदत उलटून गेल्यावरही बहुतांश कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. अद्याप संप सुरूच आहे.
एसटी संपात सहभागी झालेले कर्मचारी आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी बस फोडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने आता कठोर कारवाईचे धोरण अवलंबल्याचे दिसत आहे. ११ कर्मचाऱ्यांना महामंडळाने तातडीने बडतर्फ केलेले आहे. तर रोजंदारी पद्धतीने काम करणाऱ्या दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांवर संपात सहभागी झाल्याचा ठपका ठेवून कारवाई केली आहे.
अनिल परब यांची सुरक्षा वाढवली
परिवहन मंत्री अनिल परब रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. जिल्हा शासकीय विश्रामगृहात परब हे मुक्कामी आहेत. त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणाहून १०० मीटरवर एसटी आंदोलक आहेत. त्यामुळे परब यांनी सुरक्षा वाढवण्यात आल्याचे चित्र आहे. विश्रामगृहाला ५० कर्मचाऱ्यांचे कडे आहे. सहा वरिष्ठ पोलीस अधिकारी हे काल रात्रीपासून परब यांच्या सुरक्षेत आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी परब यांच्या सुरक्षेत वाढ केली असून, स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे दिसते.
परब काय म्हणाले?
विलीनीकरणाच्या मुद्द्यावर हायकोर्टाने नेमलेली कमिटीच निर्णय घेईल, तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. त्याव्यतिरिक्त असलेल्या मुद्द्यांवर चर्चा करावी, असं आवाहन राज्य सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, संपकरी कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर अडून बसलेले आहेत. सरकारने भरघोस पगारवाढ दिली आहे. या सगळ्या गोष्टी देऊनही फक्त एका मुद्द्यावर कामगार अडून आहेत. मला असं वाटते एसटीचे आणि जनतेचे फार मोठे नुकसान होत आहे. एसटी संपातील कामगारांवर कारवाई करण्याचा विचार केला जात आहे, असे परब यांनी सांगितले.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times