हायलाइट्स:
- एसटी कर्मचाऱ्यांना आक्रमक इशारा
- शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला अल्टिमेटम
- अपघातानंतर दिली संतप्त प्रतिक्रिया
जळगाव जिल्ह्यातील जामनेर भुसावळ दरम्यान मंगळवारी सकाळी झालेल्या आयशर आणि रिक्षाच्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेबाबत शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. पाटील यांनी मतदारसंघातील बस कर्मचार्यांना संप मागे घेण्यासाठी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा आपण स्वतः एसटी बस चालवणार असल्याची घोषणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी राज्यासह जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. या संपावर अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही, तर दुसरीकडे शासनाकडून कठोर कारवाई करण्याचा इशारा बस कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. अनेक कर्मचार्यांवर कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. मात्र यानंतरही बस कर्मचारी सेवेत रुजू होत नसल्याने बससेवा अद्यापही पूर्ववत झालेली नाही.
नागरिकांना प्रवासासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहनधारक क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करत असल्याने अपघाताचा धोका आहे. सुरक्षिततेची कुठलेही हमी नसलेल्या खासगी वाहनांमधून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. अशातच आज गारखेड्यात प्रवासी वाहतूक करणारी रिक्षाचा अपघात होऊन तीन जण ठार तर सहा जण जखमी झाले असल्याचेही यावेळी आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले. २२ डिसेंबर हा बस कर्मचाऱ्यांना अल्टिमेटमचा शेवटचा दिवस असून २३ डिसेंबरपासून आपण स्वतः कार्यकर्त्यांना सोबत घेत आता बस बाहेर काढणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं आहे.