हायलाइट्स:
- एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच
- निलंबित एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन
- रत्नागिरीतील राजापूर आगारात कार्यरत होता कर्मचारी
- याच महिन्यात झाली होती निलंबनाची कारवाई
एसटी कर्मचारी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर महामंडळाने निलंबनाची कारवाई केली आहे. आतापर्यंत हजारो कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर आगारातील तरूण कर्मचारी राकेश बांते यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याच निलंबनाच्या कारवाईचा धसका घेतल्याने बांते यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे इतर एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून राज्यभरात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. हा संप नसून दुखवटा असल्याचे एसटी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. अनेक कर्मचारी हे अद्याप कामावर रूजू झालेले नाहीत. एसटी महामंडळाने हजारो कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केलेली आहे. तर काही कर्मचाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. राजापूर आगारातील सुमारे वीस ते पंचवीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती संपात उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामध्ये राकेश रमेश बांते यांचा देखील समावेश होता. या महिन्याच्या दहा तारखेला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून ते तणावाखाली होते, अशी माहिती एसटीच्या काही कर्मचाऱ्यांनी दिली.
Nashik : एसटी कर्मचारी त्यांचा दुखवटा कितीही दिवस चालवू शकतात, न्यायालयाचा निर्णय
राकेश बांते यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने बुधवारी राजापुरातील ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र रात्री साडेदहाच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. राकेश बांते हे भंडारा जिल्ह्यातील रहिवासी होते. गेली चार वर्षे ते राजापूर आगारात कार्यरत होते. त्यांच्या निधनानंतर मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times