हायलाइट्स:
- नाताळ, नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक रायगडमध्ये
- समुद्रकिनारे, माथेरानसह इतर पर्यटनस्थळे गजबजली
- पर्यटक हजारोंच्या संख्येने पर्यटनस्थळी दाखल
- रायगडमधील पर्यटनस्थळांवरील हॉटेल हाऊसफुल्ल
नाताळ, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात येत आहे. डिसेंबरचा अखेरचा आठवडा असल्याने सुट्ट्यांचा हंगाम आहे. अशात आता पर्यटकांची पावले रायगडमधील पर्यटनस्थळांकडे वळली आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणांवर पर्यटक आले आहेत. बहुतांश पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल झाली आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, आक्षी, नागाव, किहीम, काशिद, मुरूड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि माथेरान या पर्यटन स्थळी पर्यटक मोठ्या संख्येने पोहोचले आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी झाली आहे. किनारे गजबजून गेले आहेत. २४ डिसेंबर ते २ जानेवारी २०२२ पर्यंत या पर्यटनस्थळांवरील हॉटेल्स हे आरक्षित झाले आहेत.

राज्यातील पर्यटनस्थळांना पसंती
करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पर्यटकांनी परराज्यांत पर्यटनासाठी जाण्याऐवजी यंदा राज्यातील पर्यटनस्थळांना पसंती दिल्याचे दिसून येते. त्यामुळे कोकणात दाखल होणाऱ्या पर्यटकांचा ओघ चांगलाच वाढला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील गावे पर्यटकांनी बहरण्यास सुरुवात झाली आहे. २४ आणि २५ या दोन दिवसांसाठी बंपर बुकिंग झाल्याचे पर्यटन व्यवसायिकांकडून सांगितले जात आहे. तर २ जानेवारीपर्यंत अनेक हॉटेल्स पूर्ण क्षमतेनी आरक्षित झाल्याचे सांगण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यात ओघ वाढला
विस्तीर्ण व स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी पोफळीच्या बागा, वनराई, गडकिल्ले, लेण्यांचे पर्यटकांना नेहमीच अप्रुप राहिले आहे. नाताळचा सण आणि लागून आलेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी राज्यातील विविध भागांतून पर्यटकांचा ओघ रायगड जिल्ह्यात वाढल्याचे दिसते.