हायलाइट्स:
- राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढतोय
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं भाष्य
- सिंधुदुर्गमध्ये घेतली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक
- सरकारची पूर्ण तयारी असल्याची दिली माहिती
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सिंधुदुर्गमध्ये आज, रविवारी आले. हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी बैठकीचे नियोजन केले होते. तसेच जिल्ह्यातील कोविड १९ विषाणूचा प्रादुर्भाव व उपाययोजनांचा आढावा आणि चक्रीवादळ, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व मदत व पुनर्वसनाचा देखील आढावा त्यांनी या बैठकीत घेतला. यावेळी त्यांनी करोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असल्याचे म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी काल, शनिवारी रात्री देशाला संबोधित करताना १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि करोनाविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देण्यासंदर्भात घोषणा केली. त्यावरही पवार यांनी भाष्य केले. राज्य सरकारची पूर्णपणे तयारी असल्याचे पवार म्हणाले.
…म्हणून सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलो
या आर्थिक वर्षाचे आता तीनच महिने बाकी आहेत. त्याच्यामुळे मी आज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांना दिलेला निधी किती टक्के खर्च झाला आहे? किती टक्के खर्च व्हायचा आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्यास शिल्लक निधी खर्च करू शकतील का? त्याबद्दलचा मी आढावा घेतला, असे पवार यांनी यावेळी सांगितले. पैसे खर्च करत असताना आमदार निधी, डोंगरी विकास निधीचा पैसा जिल्ह्याच्या विकास कामासाठी उपयोगी ठरतो. त्याच्यावर त्या पद्धतीने त्यांनी ते पैसे खर्च करावेत, अशी आमची साधारण धारणा आहे. म्हणून त्याचा आढावा घेण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलो, असे पवार म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांना देण्यासाठी आपल्याकडे चौदाशे कोटी रुपये बाकी होते. पुरवणी मागण्यांमध्ये चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यात नैसर्गिक संकटग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात पैसे देणे बाकी होते, ते सगळे प्रश्न आता निकाली निघालेले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
खडसे-चंद्रकांत पाटील वादावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया
त्यामुळे राज्यपालांचे अधिकार
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांकडे पाठवलेल्या प्रस्तावावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवला आहे. काल मी दिवसभर पुणे दौऱ्यावर होतो, रात्री बारामती आणि सकाळी आता सिंधुदुर्गमध्ये, आणि दुपारी रत्नागिरीला, तर संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मुंबईत गेल्यानंतर त्याबाबत माहिती घेतो. आताच्या घडीला मला त्याबाबत काही माहिती नाही. कुठल्या फाइलवर सही करायची, हा सर्वस्वी अधिकार राज्यपालांना असतो. लोकशाहीमध्ये ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत. त्या परंपरांचे पालन राज्यकर्ते करतील. राज्यपालांनी पण केलं पाहिजे, असे पवार म्हणाले.