हायलाइट्स:

  • आता राज्य सरकार विनंतीवजा पत्र राज्यपालांना पाठवू शकते
  • राज्य सरकारने नुकताच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला परवानगी नाकारल्यानंतर संघर्षाची ठिणगी पडली आहे. मात्र, राज्यपालांना अशाप्रकारे अध्यक्षपदाच्या निवडणुकीला परवानगी नाकारता येत नाही, असे मत ज्येष्ठ घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला. राज्यपालांनी लक्षात ठेवावे की, ते केंद्र सरकारचे नोकर नाहीत, तर ते राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. घटनेतील १६३ कलमानुसार राज्य मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला किंवा शिफारस राज्यपालांनी पाळणे बंधनकारक असते. ज्याप्रमाणे पंतप्रधानांचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो, तसाच राज्य मंत्रिमंडळाचा सल्ला राज्यपालांवर बंधनकारक असतो. अपवादात्मक परिस्थितीत राज्यपाल शिफारस फेटाळू शकतात. पण आता जो मुद्दा आहे, तो तारतम्यात येत नाही. त्यामुळे राज्यपालांनी ताबडतोब मंत्रिमंडळाचे म्हणणे मान्य करायला हवे, असे उल्हास बापट यांनी सांगितले.

आता राज्य सरकार विनंतीवजा पत्र राज्यपालांना पाठवू शकते. याशिवाय, राज्य सरकारला न्यायालयातही जाता येईल. मात्र, प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जाण्याची वेळ का येते, याचा विचार झाला पाहिजे. विधानसभेचा अध्यक्ष हे प्रतिष्ठेचे पद आहे. त्यामुळे सत्तधारी आणि विरोधकांनी अध्यक्षांची निवड बिनविरोध केली पाहिजे, असे उल्हास बापट यांनी सांगितले.
इतका अभ्यास बरा नव्हे, राज्यपालांना अभ्यासाचं ओझं झेपलं पाहिजे; राऊतांचा टोला
राज्य सरकारने नुकताच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मंजूरी आवश्यक होती. मात्र, राज्यपालांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीच्या खुल्या मतदान पद्धतीवर बोट ठेवले आहे. यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होत असे. त्यामुळे निवडणूक पद्धतीत बदल करुन आवाजी मतदानाची पद्धत अंगीकारणे घटनाबाह्य असल्याचे पत्र राज्यपालांनी महाविकासआघाडी सरकारला पाठवले आहे.

तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षाची निवड कोणत्याही परिस्थितीत हिवाळी अधिवेशनातच करायची यावर महाविकासआघाडीचे नेते ठाम आहेत. तसेच ही निवडणूक आवाजी पद्धतीनेच होईल, यासाठी महाविकासआघाडी आग्रही आहे. हिवाळी अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक पार न पडल्यास राज्यपालांची मंजूरी मिळण्याची वाट पाहिली जाऊ शकते. ही मंजूरी मिळाल्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन होईल, अशी शक्यताही काहीजण बोलून दाखवत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here