हायलाइट्स:
- जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू
- चिमुकल्यांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले!
- एकाला अटक; चार जण ताब्यात
जळगावातील शिवाजीनगर हुडको परिसरात एका तरुणाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असतानाच दुसऱ्या गटातील तरुणाने डीपीवर काठी मारुन वीजपुरवठा खंडीत केला. याचा राग आल्यामुळे दोन गटात बाचाबाची झाली. यात दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. या दंगलप्रकरणी रणजीत उर्फ बबलु हिरालाल जोहरी व समीर शेरु खान उर्फ पप्या (वय १९) या दोघांनी शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र फिर्यादी दिल्या आहेत. त्यानुसार परस्परविरोधी दंगलीचे गुन्हे दाखल आहेत.
ही दंगल सुरू असतानाच मृत शकील हा घरातच होता. आपला शेजारी राहणारा भाचा दंगलीत अडकला आहे का? अशी काळजी करुन शकील त्याला पाहण्यासाठी घराबाहेर आला. खरं तर त्यावेळी त्याचा भाच घरातच होता. मात्र घराबाहेर पडलेल्या शकीलच्या डोक्याला दगडफेकीत एक दगड लागला. यामुळे खाली पडल्याने त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूलाही दुखापत झाली. शकीलवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानतंर तो घरी परतला होता. अस्वस्थ वाटत असल्याने दोन दिवसांपूर्वी पुन्हा शकीलला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच गुरुवारी दुपारी दोन वाजता त्याचा मृत्यू झाला.
दंगलीने हिरावले तीन चिमुरड्यांचे पितृछत्र
मृत शकील हा घरातील कर्ता पुरुष होता. मजुरी करुन तो आई-वडील, पत्नी व तीन मुलांचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात वडील उस्मान अली, आई हाजराबी, पत्नी, आसमा, मुलगी जवेरीया (५ वर्षे), मुले नवाज (३ वर्षे) व हसनैन (दीड वर्षे) असा परिवार आहे. दंगलीमुळे तीन चिमुरड्यांचे पितृछत्र हरपलं आहे.
रुग्णालयात तणाव
शकीलच्या मृत्यूची वार्ता पसरताच शिवाजीनगर हुडको परिसरात पसरताच मोठा जमाव रुग्णालयात दाखल झाला होता. शकीलवर दगडफेक करणाऱ्या दोन जणांना अटक व जामीन झाला असून आता ते मुक्त आहेत. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्यात खुनाच्या कलमांची वाढ करुन सर्व संशयितांना तात्काळ अटक करावी अशी मागणी शकीलच्या कुटुंबीयांनी केली होती. यावेळी रुग्णालयात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी खूनाचे कलम वाढवून कृष्णा पांडुरंग सोनवणे उर्फ आप्पा याला अटक केली. तर बबलू जोहरी, दीपक सखाराम बागुल, बंटी, कल्पेश शिंपी, साई जगताप यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.