मुंबई: दवाखाने बंद ठेवून नागरिकांची गैरसोय करणाऱ्या डॉक्टरांचे परवाने रद्द करण्याची कडक कारवाई महापालिका प्रशासनाने करावी, असे आदेश स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले आहेत. तसेच झोपडपट्टी परिसरातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांना तुरुंगात टाकावे, असे आदेशही त्यांनी दिले.

मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. संसर्गातून दुसऱ्या व्यक्तीला करोनाची लागण होत आहे. त्यामुळे मुंबईकर धास्तावले आहेत. तर दुसरीकडे झोपडपट्टी व सोसायटी परिसरात ताप, सर्दी, खोकला, पोटदुखी आदी लहानसहान आजारांवर तात्काळ उपचार देण्यासाठी खासगी दवाखान्यातील डॉक्टर हे जास्त उपयोगी पडतात. असे असताना अनेक डॉक्टरांनी संसर्गाच्या भीतीपोटी त्यांचे खासगी दवाखाने बंद ठेवले आहेत. त्यामुळे सामान्य, गरीब नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत पालिकेकडे तक्रारी आल्या आहेत.

डॉक्टरांना त्यांचे दवाखाने सुरु करण्यासाठी पालिकेच्या लायसन्स आणि आरोग्य विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. डॉक्टरांची सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. असे असताना अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने अचानकपणे बंद केल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. यामुळे ज्या डॉक्टरांना पालिकेने दवाखाने सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे, अशा डॉक्टरांना पालिकेने नोटीस देऊन त्यांचे दवाखाने सुरू करण्याचे आदेश द्यावे. मात्र नोटीस दिल्यानंतरही जे डॉक्टर दवाखाने सुरु करणार नाहीत त्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी, असे आदेश जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here