हायलाइट्स:
- गुणरत्न सदावर्ते यांना हटवून आता त्यांच्याऐवजी दुसरे वकील एसटी कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडणार आहेत
- वकील सतीश पेंडसे यांच्याकडे आता युक्तिवाद करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे
गुणरत्न सदावर्ते कामगारांना चुकीच्या पद्धतीने भडकावत आहेत. आम्ही शरद पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीतील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन दिले. तसेच अजूनही कामावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही वाचणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपला रोजीरोटी वाचवली पाहिजे. एसटी टिकली तरच त्यांचा रोजगार टिकणार आहे, ही गोष्ट कर्मचाऱ्यांना ध्यानात ठेवावी, असेही सुनील निर्भवणे यांनी सांगितले.
गुणरत्न सदावर्ते यांना हटवून आता त्यांच्याऐवजी दुसरे वकील एसटी कर्मचाऱ्यांची बाजू न्यायालयात मांडणार आहेत. वकील सतीश पेंडसे यांच्याकडे आता युक्तिवाद करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती पत्रकारपरिषदेत देण्यात आली.
कुठपर्यंत ताणायचं याचं तारतम्य बाळगावं: शरद पवार
आपली बांधिलकी ही प्रवाशांशी आहे, ही बाब एसटी कर्मचाऱ्यांनी ध्यानात ठेवावी. राज्य सरकार तुमच्या मागण्यांविषयी सकारात्मक आहे. मागण्या करण्यात काहीही गैर नाही. पण मागण्या मांडताना कुठपर्यंत जावं, याचं तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. एसटी कृती समितीतील संघटनांनी हे तारतम्य बाळगत संप मागे घेण्याची हाक दिली आहे. परिवहनमंत्र्यांनीही मागणयांविषयी सकारात्मक भूमिका दाखवली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी या सगळ्याचा गांभीर्याने विचार करत संप मागे घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले.
गेल्या ३०-४० वर्षांमध्ये एसटीचा संप झाला तेव्हा त्यांच्या प्रतिनिधींशी मी अनेकदा चर्चा केली आहे. दरवेळी एसटी कर्मचाऱ्यांचा प्रवाशांविषयीचा दृष्टीकोन विधायकच असल्याचे मला दिसले आहे. मागण्या करण्यात काही चूक नाही. परंतु, त्या मांडताना कुठपर्यंत जावं, याचं तारतम्य ठेवलं पाहिजे. मात्र, यावेळी पहिल्यांदाच काहीजणांनी एसटी संघटना आणि सरकारने कामगारांच्या भल्यासाठी भूमिका घेऊनही ऐकायचेच नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे मागण्या मान्य करुनही राज्य सरकारला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अन्यथा हा संप दोन महिने रेंगाळलाच नसता, असे शरद पवार यांनी म्हटले.