म. टा. वृत्तसेवा, निफाड

पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थानहून जिल्ह्यातील निफाड येथे गारेगार विकणाऱ्या राजस्थानी युवकांवर चांगलेच संकट कोसळले आहे. देशभरात पसरलेल्या भीतीदायक वातावरणात हे चार युवक निफाडवरून राजस्थानच्या दिशेने पायी निघाले आहेत. खिशात पैशाचा तुटवडा खायला-प्यायला अन्नही नाही अशा अवस्थेत हे युवक राजस्थानच्या दिशेने पायी निघाले आहे. सुमारे पाचशे ते सहाशे किलोमीटरचे अंतर या युवकांकडून कसे गाठले जाणार? याबाबत निफाडकरांनी हळहळ व्यक्त केली आहे.

निफाड येथे गारेगार विकणाऱ्या एका राजस्थानच्या कारागिराने आपल्याच राज्यातील चार युवकांना गारेगार आईस्क्रीम विकण्यासाठी निफाड येथे बोलावून त्यांना रोजगार दिला आहे. गेल्या महिन्यात संबंधित मालक लग्नकार्यासाठी राजस्थानात गेला आणि देशभरात करोनाचे वातावरण तयार झाले. त्यामुळे तो नाशिक, निफाडला येण्यास उशिर झाला. त्यातच २५ मार्चपासून संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यामुळे तो मालक आता राजस्थानमध्येच अडकला आहे. मालक येत नसल्याने या युवकांपुढे मोठा पेच उभा राहिला. आता या अनोळखी शहरात जगायचं कसं आणि कोणाचा भरवशावर, या विचाराने ते हादरले. खिशात पैसे नाही आणि बँकेत पैसे टाकायला मालकाला राजस्थामध्ये घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे या चार राजस्थानी युवकांनी पायीचे राजस्थान गाठण्याचा निर्णय घेतला आहे. खिशात दमडी नसताना बरोबर अन्नसाठा नसताना हे युवक रस्त्याने जे मिळेल ते घेत आपल्या घराच्या दिशेने पायी निघाले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here