हायलाइट्स:
- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा मोदींना टोला
- बरे झाले यावेळी लॉकडाउनची घोषणा केली नाही- मलिक
- करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
- मागील वेळी विचार न करता लॉकडाउन घोषित केला होता
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपचे अनेक नेते राजीनामा देऊन अन्य पक्षांत प्रवेश करत आहेत. त्याबाबतही नवाब मलिक यांनी भाष्य केले. पाच वर्षांचे अहंकारी सरकार हे एक कारण यामागे आहे, अशी टीका त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधून करोना परिस्थितीचा आढावा घेतला. याबाबत बोलताना मलिक म्हणाले की, लॉकडाउन लागू शकतो, अशी भीती लोकांमध्ये होती. मात्र, ही एक चांगली गोष्ट आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना, स्थानिक पातळीवरील सद्यस्थितीवर राज्यांना यासंबंधी निर्णय घेण्यास सांगितले. मागील वेळी कोणताही विचार न करता आणि लोकांना विश्वासात न घेता लॉकडाउनची घोषणा केली होती, असा टोला मलिक यांनी लगावला. यावेळी करोना रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र, लोक खबरदारी घेत आहेत. त्यामुळे हे एक बरे झाले की लॉकडाउनची घोषणा केली नाही, असेही ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात भाजपच्या अनेक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. त्याबाबत भाष्य करताना मलिक म्हणाले की, ‘भाजपचे राज्यातील नेते आणि आमदारांचे राजीनामासत्र थांबण्याचे नाव घेत नाही. पाच वर्षांचे अहंकारी सरकार, अपमानास्पद वागणूक आणि गावागावांमध्ये भीती पसरवणे ही कारणे यामागे आहेत,’ असे मलिक म्हणाले. मला वाटते की आगामी दिवसांत भाजपचे आणखी काही नेते पक्ष सोडू शकतात. उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार हे यावरून स्पष्ट होत आहे, असेही मलिक म्हणाले.