हायलाइट्स:
- एखाद्याला मालिकेतून काढल्यावरुन राजकारण करणे योग्य नाही
- ‘स्टार प्रवाह’चे मालक, मालिकेचे दिग्दर्शक किंवा निर्मात्यांचा भाजपचा कोणताही संबंध नाही
दरम्यान, या सगळ्या वादानंतर ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या निर्मात्यांकडूनही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. किरण माने यांना राजकीय भूमिका घेतल्यामुळे मालिकेतून काढण्यात आलेले नाही. त्यांच्यावर व्यावसायिक कारणांमुळे कारवाई करण्यात आल्याचे मालिकेच्या निर्मात्यांकडून सांगण्यात आले.
किरण मानेंना मालिकेतून काढण्यात भाजपचा हात नाही: प्रवीण दरेकर
एखाद्याला मालिकेतून काढल्यावरुन राजकारण करणे योग्य नाही. ‘स्टार प्रवाह’चे मालक, मालिकेचे दिग्दर्शक किंवा निर्मात्यांचा भाजपचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे हा ‘स्टार प्रवाह’ स्वतंत्र विषय आहे. किरण माने यांना मालिकेत पुन्हा घेतलं तरी आमची हरकत नाही. काढणं, ठेवणं हा सर्वस्वी ‘स्टार प्रवाह’चा अधिकार आहे, असे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
‘एखादी विचारसरणी लादण्यासाठी कलाकारांच्या पोटावर पाय मारण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही’
अभिनेते किरण माने यांनी त्यांचे विचार समाज माध्यमावर व्यक्त करून कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार त्यांना संविधानाने दिलेला आहे. सरकारच्याविरोधात मत व्यक्त केले म्हणून त्या कलाकाराला मालिकेतून काढून टाकणार का? असा संतप्त सवाल विचारत, महाराष्ट्र हे कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.
भाजप सरकारविरोधात समाज माध्यमावर मत व्यक्त केले म्हणून ‘स्टार प्रवाह’ या खाजगी वाहिनीने किरण माने या कलाकाराला ‘मुलगी झाली हो’, या मालिकेतून काढण्यात आले हे अत्यंत निषेधार्ह असून ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीने केलेल्या या चुकीबद्दल जाहीर माफी मागितली पाहिजे, असे लोंढे म्हणाले.