ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दिनू रणदिवे हे दादरच्या फूल मार्केटजवळ राहतात. विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानं राज्यात संचारबंदी लागू केली आहे. या परिस्थितीत सरकार एकट्या राहणाऱ्या वृद्ध जोडप्यांपर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक सर्व सुविधा आणि मदत देत आहे. रणदिवे दाम्पत्यालाही कोणती अडचण नाही ना? अथवा त्यांना कोणती मदत हवी आहे हे जाणून घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: त्यांची भेट घेतली व आग्रहाने त्यांना काही जीवनावश्यक वस्तू दिल्या. तसंच मास्क आणि सॅनिटायझरही दिलं.
अत्यंत स्नेहमय वातावरणात ही भेट पार पडली. खरं तर आपण सारेच अशा थोर स्वातंत्र्यसेनानींचे ऋणी आहोत. हे आपण कधीही विसरू नये. आपण सर्वांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे, असं गृहमंत्री देशमुख म्हणाले. आज मला इथे यायला मिळालं, काही वेळ या ज्येष्ठ व्यक्तींना देऊ शकलो व त्यांच्याकरिता काही करता आलं हे माझं भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सर्वच ठिकाणी त्यांना स्वत:ला जाणं अशक्य आहे. आपल्या माध्यमातून सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना आव्हान करतो की ज्यांना ज्यांना समाजातील ज्येष्ठ व्यक्तींची मदत करता येईल त्यांनी ती करावी. तसंच आपली पोलीस यंत्रणा ही आपापल्या भागातील ज्येष्ठांची माहिती घेऊन त्यांना ही मदत करतील ही अपेक्षा बाळगतो, असंही ते म्हणाले. रणदिवे दाम्पत्याकडे विशेष लक्ष देण्याचे आदेशही त्यांनी स्थानिक पोलिसांना दिले.
गृहमंत्री स्वतःहून भेट देऊन आस्थेनं विचारपूस करत आहेत. लोक या परिस्थितीमुळं घाबरलेले आहेत. पण गृहमंत्री स्वतः भेटायला येत आहेत. ते स्वतः लक्ष देत आहेत. त्यामुळं लोक निर्भय होतील, अशी प्रतिक्रिया रणदिवे यांनी व्यक्त केली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times