१२ वर्षांच्या संसारानंतर नितीश आणि स्मिता यांनी हा निर्णय घेतला. स्मिता आयएएस अधिकारी आहेत. दोघांनी सप्टेंबर २०१९ मध्ये मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. हे प्रकरण अजूनही न्यायालयात आहे. दोघांना जुळ्या मुली आहेत, त्या सध्या आपल्या आईसोबत इंदूरमध्ये राहतात.
‘घटस्फोट मृत्यूपेक्षाही वेदनादायी’
नितीश यांनी पत्नीपासून विभक्त होण्याबाबत BT शी चर्चा केली. ते म्हणाले की, ‘हो, मी सप्टेंबर २०१९ मध्ये मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. आम्ही वेगळे का झालो याच्या कारणांमध्ये मला जायचं नाही. हे प्रकरण अजूनही न्यायालयात आहे. मी फक्त एवढंच सांगू शकतो की कधीकधी घटस्फोट मृत्यूपेक्षा जास्त वेदनादायक असू शकतो, कारण तुम्ही तुटलेल्या भागासह जगत असता.’

‘मी दुर्दैवीच राहिलो आहे’
लग्नाबद्दल बोलताना नितीश म्हणाले, ‘माझा लग्न संस्थेवर ठाम विश्वास आहे, पण याबाबतीत मी दुर्दैवी ठरलो. लग्न मोडण्याची अनेक कारणं असू शकतात. काहीवेळा ते तडजोड न करण्याच्या वृत्तीमुळे किंवा अपुऱ्या सहवासामुळे मोडू शकतं. कधीकधी याचं कारण अहंकार असू शकतं किंवा फक्त स्वतःबद्दल विचार करणारी विचारसरणीही असू शकते. पण जेव्हा कुटुंब तुटतं तेव्हा सगळ्यात जास्त त्रास मुलांना होतो. त्यामुळे आपल्या मुलांचं कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेणं ही पालकांची जबाबदारी आहे.’
तुम्ही तुमच्या मुलींच्या नियमित संपर्कात आहात का असा प्रश्न त्यांना विचारला असता अभिनेत्याने उत्तर दिलं की, ‘मी त्याला भेटू शकेन की नाही यावर मी माझं मत राखून ठेवू इच्छितो.’
नितीश यांचं पहिलं लग्न १९९१ मध्ये मोनिषा पाटीलसोबत झालं होतं. त्यांना दोन मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. मात्र, हे नातं काही वर्षांनंतर तुटलं आणि २००५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर नितीश यांनी १९९२ बॅचच्या (मध्य प्रदेश कॅडर) IAS अधिकारी स्मिता गाते यांच्याशी २००९ मध्ये लग्न केलं, पण आता हे नातंही संपुष्टात आलं आहे.