हायलाइट्स:
- पारनेर नगरपंचायत निवडणुकीत कोणालाही बहुमत नाही
- चुरशीच्या लढतीनंतर राजकीय स्थिती त्रिशंकू
- नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असल्याचा लंके यांचा दावा
नगर जिल्ह्यात कर्जतपाठोपाठ पारनेरची निवडणूकही गाजली. राष्ट्रवादीचे आमदार लंके आणि शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्यात यासाठी चुरस होती. विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील राजकारण फिरलं असून लंके यांच्यासाठी अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे पारनेर शहरात काय होते, याकडे लक्ष लागलं होतं. मात्र, तेथे औटी यांनी राष्ट्रवादीला चांगलीच लढत दिली. लंके आमदार झाल्यानंतर त्यांनी शिवसेना फोडली होती. नगरसेवकांचाच राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला होता. मात्र, वरिष्ठ पातळीवर याची दखल घेण्यात आली. त्यामुळे लंके यांना थेट मातोश्रीवर जाऊन या नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेकडे सोपवावे लागले होते.
निलेश लंके यांची ही चाल त्यावेळी नगरपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच असल्याचे बोललं जात होतं. मधल्या काळात लंके आणि औटी यांच्यात अनेक संघर्षाचे प्रसंगही घडून गेले. शिवसेनेच्या एका गटाकडूनही औटी यांना विरोध झाला. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीत काय होणार, याकडे लक्ष लागले होते. निवडणूक एकतर्फी होऊन राष्ट्रवादीची सत्ता येईल, असं लंके यांच्या समर्थकांना वाटत होतं. प्रत्यक्षात औटी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने चांगलीच लढत दिली.
निकालानंतर बोलताना आमदार लंके म्हणाले, निकालात त्रिशंकू अवस्था दिसत असली तरी ही वरवरची स्थिती आहे. प्रत्यक्षात नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार आहे. पारनेर नगरपंचायतीत शिवसेनेची दीर्घकाळ सत्ता होती. हे विजय औटी यांचे गाव आहे. आम्हाला शून्यातून सुरुवात करायची होती. विधानसभा निवडणुकीतही पारनेर शहरातून आपल्याला कमी मते मिळाली होती. आता नगरपंचायतीला मिळालेल्या जागा पाहिल्या तर आम्ही त्यात बऱ्यापैकी यशस्वी झालो आहोत, असंही लंके म्हणाले.