हायलाइट्स:
- नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर
- भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही नंबर १ चा दावा
- राष्ट्रवादीने दिले कार्यकर्ते आणि मतदारांना श्रेय
- चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपने जिंकल्या सर्वाधिक जागा
राष्ट्रवादीचे जयंत पाटील काय म्हणाले?
राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागले असून, हे निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केल्याबद्दल राज्यातील सर्व मतदारांचे जयंत पाटील यांनी आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा करुन तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. पक्षाच्या बांधणीसाठी विविध उपक्रमे, आंदोलने, कार्यक्रम घेतले. जनता दरबार उपक्रमातून जनतेची कामेही तत्परतेने करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचाही फायदा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला आहे, असे ते म्हणाले. या निकालांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलणाऱ्यांना चांगलीच चपराक लागली आहे, असे सांगतानाच पक्षासाठी सदैव काम करणाऱ्या, पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपच नंबर १
राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती; तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भाजपने सर्वाधिक जागा मिळविल्या असून, पुन्हा एकदा ‘भाजपच नंबर वन’ असल्याचे सिद्ध झाले आहे, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सांगितले. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी आणि सुनील कर्जतकर उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरविल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मतदारांचे आभार मानले. पक्षाच्या गावोगावच्या नेते, कार्यकर्त्यांचे अभिनंदनही केले. भाजपला या निवडणुकीत चारशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. स्वबळावर किंवा काही मदत घेऊन ३४ नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये भाजपची सत्ता असेल. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असेल, तर भंडारा जिल्हा परिषदेत मदत घेऊन भाजप सत्तेवर येईल, असे पाटील म्हणाले. गेली २६ महिने भाजप राज्यात सत्तेबाहेर आहे, तरीही पक्षाचे संघटन मजबूत आहे. भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांची एकजूट आहे. त्यामुळे पक्षाला निवडणुकीत यश मिळाले आहे, असंही ते म्हणाले. सत्ताधारी आघाडीमध्ये बेबनाव आहे. त्यांच्यात समन्वय नाही. करोनाचा सामना करणे आणि राज्यात विकासकामे करण्यापेक्षा आघाडीचे नेते कमाईमध्ये गुंतले आहेत. जनता या प्रकाराला कंटाळली आहे. जनतेची नाराजी नगरपालिका, नगरपंचायतींच्या निकालात दिसली, असा टोला त्यांनी लगावला. राज्यात नोव्हेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. त्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका, जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका किंवा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेने भाजपला कौल दिला होता. तसाच कौल नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीतही दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
शहापूर नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचा १० जागांवर विजय