हायलाइट्स:
- गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप विरूद्ध शिवसेना
- संजय राऊत यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना सुनावले
- भाजपवरही राऊत यांनी साधला निशाणा
- ‘भाजपकडून भ्रष्टाचारी माणसाला उमेदवारी, उत्पल पर्रिकरांना शुभेच्छा’
गोव्यात शिवसेनेने काँग्रेसपुढे निवडणूकपूर्व आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले,’ अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी दिली होती. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता, मी काल पणजीत होतो. मी याबाबत राहुल गांधी यांनाही सांगितलं. प्रियांका गांधी यांच्याशीही बोलणे झाले. तेथील काँग्रेसचे काही नेते आहेत, त्यांच्याशीही बोलणे झाले. मात्र, स्वबळावर सत्ता स्थापन करू, असे तेथील स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, इतका कॉन्फिडन्स त्यांच्याकडे येतो कुठून? अशा शब्दांत राऊत यांनी टीका केली. इतका जर कॉन्फिडन्स असेल तर, आम्हालाही त्यांच्याकडून थोडा उधार घ्यावा लागेल, असा खोचक टोलाही राऊत यांनी लगावला.
‘भाजपकडून भ्रष्टाचारी माणसाला उमेदवारी, उत्पल पर्रिकरांना शुभेच्छा’
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा मुलगा उत्पल यांना पणजीतून भाजपने तिकीट नाकारल्यानंतर, शुक्रवारी त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पणजी विधानसभा मतदारसंघातून आता ते अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहेत. पर्रिकर यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यास त्यांना पाठिंबा देण्याची तयारी आहे, असे संजय राऊत म्हणाले होते. याबाबत बोलताना राऊत यांनी सांगितले की, ‘राजकारण कसे असावे हे मनोहर पर्रिकर यांनी दाखवून दिले आहे. मात्र, उत्पल पर्रिकर यांच्यावर भाजपने अन्याय केलेला आहे. आता ही लढाई चरित्र आणि बेइमानी अशी होणार आहे. पणजी येथून मनोहर पर्रिकर यांनी नेतृत्व केलेले आहे. तिथे आता भाजपकडून एका भ्रष्टाचारी माणसाला उमेदवारी दिली आहे. आम्ही उत्पलला शुभेच्छा देतो, ‘ असे राऊत यांनी सांगितले.
भाजपच्या ‘त्या’ टीकेला जोरदार प्रत्युत्तर
गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ असून, तिथे पक्षाने डिपॉझिट जरी वाचवले तरी मी संजय राऊत सांगतील तिथे त्यांना चहा आणि जेवण देईन, अशा शब्दांत भाजपचे नेते आशीष शेलार यांनी शुक्रवारी राऊत यांना टोला लगावला होता. या टीकेला राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आम्ही डिपॉझिट गेले तरी लढत राहू. ‘बचेंगे तो, और लडेंगे’ असे राऊत यांनी ठामपणे सांगितले. आम्ही लढणारी माणसं आहोत. भ्रष्ट, माफिया, धनदांडग्यांना जर तिकीटं दिली असती, तर आम्हीही जिंकलो असतो, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.