हायलाइट्स:
- औरंगाबादमध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यासाठी एमआयएमचा विरोध का आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला
- महाराणा प्रताप यांची तलवार मोगलांविरुद्ध चालली, त्यांनी हिंदूंचे रक्षण केले
यावेळी त्यांनी पुन्हा एकदा गोव्यात भाजपला कोणत्याही परिस्थितीत बहुमत मिळणार नाही, असा दावा केला. गोव्यात मनोहर पर्रिकर आणि लक्ष्मीकांत पार्सेकर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असणाऱ्या दोन नेत्यांनी भाजप पक्ष रुजवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. मात्र, आता मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल भाजपमधून बाहेर पडला आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली. अशा परिस्थितीत भाजपला गोव्यात बहुमत मिळणार नाही, हे मी लिहून देतो, असे राऊत यांनी म्हटले. तसेच गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना १२ तर राष्ट्रवादी काँग्रेस ७ ते ८ जागांवर लढेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
‘महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांचा वेळ जात नाही म्हणून भ्रष्टाचाराचे आरोप करतायत’
महाविकासआघाडी सरकारने दोन वर्षे पूर्ण केली आहेत. आणखी तीन वर्षे हे सरकार टिकेल. त्यामुळे भाजप नेत्यांकडे वेळ घालवायला काहीच साधन नाही. त्यामुळे ते पालिका आणि सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. या खेळामध्ये त्यांनी आता राजभवनालाही सामील करुन घेतले आहे. खरंतर महाराष्ट्रात विरोधी पक्षाकडे मोठे संख्याबळ आहे. या संख्याबळाचा वापर करुन त्यांनी लोकशाहीच्यादृष्टीने विधायक कामं करता येतील. पण ते तसे करत नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊतांचा एमआयएमला इशारा
औरंगाबादमध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यासाठी एमआयएमचा विरोध का आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. महाराणा प्रताप यांची तलवार मोगलांविरुद्ध चालली, त्यांनी हिंदूंचे रक्षण केले. त्यामुळे जर कोणी त्यांचा पुतळा उभारण्यास विरोध करत असेल तर महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराज यांची तलवार आमच्या हातात आहे, याचं भान त्यांनी ठेवावं, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.