हायलाइट्स:
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
- देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर
- शिवसेना जन्माला येण्याआधीच मुंबईत भाजपचा नगरसेवक
- तुमचं हिंदुत्व हे भाषण आणि कागदावरील – फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी आज, सोमवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. ‘उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कालच्या भाषणात सोयीचा इतिहास प्रामुख्याने पाहायला मिळाला. २५ वर्षे युतीत सडलो असे ठाकरे म्हणाले. पण २०१०-२०१२ पर्यंत तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे युतीचे नेते होते. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. मग तुम्ही बाळासाहेबांच्या निर्णयाकडे बोट दाखवत आहात काय?’ असा सवाल फडणवीस यांनी केला. बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले असे तुमचे म्हणणे आहे काय, असा आम्हाला प्रश्न पडला आहे, असेही फडणवीस म्हणाले.
शिवसेना जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक-आमदार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेला फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. तुमचा पक्ष (शिवसेना) जन्माला यायच्या आधी मुंबईत आमचा म्हणजेच भाजपचा नगरसेवक आणि आमदार होता. १९८४ साली लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढलात आणि हे भाजपसोबत सडलो असे सांगतात. भाजपसोबत असताना हे पहिल्या क्रमांकाचे पक्ष झाले, तर भाजपला सोडल्यानंतर हे चौथ्या क्रमांकावर गेले, यावर त्यांनी बोलले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
तुमचं हिंदुत्व भाषणातलं, कागदावरचं!
भाजपचं हिंदुत्व ढोंगी असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात काय बोलणार हे आधीच शिवसैनिकांना कळलं असेल, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. खरं तर आम्ही लाठ्या-काठ्या खाल्ल्या. तुम्ही केवळ तोंडातून वाफा सोडत होतात. राम मंदिर मोदीजींच्या नेतृत्वाखाली तयार होत आहे. तुम्ही साधा दुर्गाडीचा किंवा श्री मलंगगडचा किल्ल्याचा प्रश्न सोडवू शकला नाहीत. भाषणाच्या पलीकडे तुमचं हिंदुत्व काय? असा सवाल फडणवीस यांनी केला. उद्धव यांच्या भाषणात महाराष्ट्र हिताचे असे काही नाही. महाराष्ट्राच्या समस्यांबाबत काही नाही. दिशा काय देणार हे देखील माहिती नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.