हायलाइट्स:
- गावगुंडाशी संबंध जोडून राज्यातील भाजप नेते पंतप्रधानांना बदनाम करत आहेत: नाना पटोले
- गावगुंड आणि पंतप्रधानांमधील फरक न कळणाऱ्या भाजप नेत्यांना उपचाराची गरज – पटोले
- भारत माता की जय’ म्हणत देश विकणाऱ्यांविरोधात आंदोलन करा, पटोलेंचे आवाहन
पटोले म्हणाले की, ‘मी एका गावगुंडाबद्दल बोललो होतो, त्या गावगुंडाने प्रसार माध्यमांसमोर येऊन सर्व सांगितले आहे. तसेच तो गावगुंड जे बोलला, ते मी माध्यमांना सांगितले. मी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल कोणताही अपशब्द वापरलेला नाही. त्यामुळे हे थांबवा असे मी म्हणालो, तरीही भाजप माझ्याविरोधात आंदोलन करून पुतळ्यांचे दहन करत आहेत. भाजप त्या गावगुंडाचे समर्थन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्याचा संबंध जोडून, त्यांना बदनाम करण्याची मोहीम चालवत आहे.’
भाजपला माझे पुतळे जाळायचे असतील, तर त्यांनी खुशाल जाळावेत. पण भारत माता की जय म्हणून जे लोक देश विकत आहेत, त्यांचे पुतळे जाळा, ‘बेटी बचाव, बेटी…, म्हणणाऱ्यांचे पुतळे जाळा, शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारणाऱ्यांचे पुतळे जाळा. देशात आज अनेक प्रश्न आहेत. शेतकरी आत्महत्यांबरोबर बेरोजगारांच्या आत्महत्याही वाढत आहेत. ज्यांच्यामुळे देशाची अधोगती सुरू आहे, त्यांचे पुतळे त्यांनी जाळावेत, असेही पटोले म्हणाले.
पंतप्रधानपदाचा मान, सन्मान, प्रतिष्ठा याची काँग्रेसला जाणीव आहे, त्या पदाचा अवमान करणे ही काँग्रेसची संस्कृती नाही; परंतु भाजपचे नेतेच डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधानपदावर असताना कोणत्या भाषेत बोलत होते, ते सर्वांना माहीत आहे. स्वतःला सुसंस्कृत पक्ष म्हणणाऱ्या भाजपचा सुसंस्कृतपणा त्यावेळी कुठे गेला होता? तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य आणि माझे वक्तव्य हे दोन्ही विषय वेगळे आहेत. त्याची तुलना भाजपने करू नये, असेही पटोले म्हणाले.
पटोले म्हणाले की, माझे मानसिक संतुलन बिघडले आहे, असे म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेच खरेतर मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत आहे. नगरपालिका निवडणुकीत विदर्भात काँग्रेसने भाजपला धूळ चारली आहे. भाजपचा आम्ही पराभव केला आहे, त्यामुळे त्यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे, या धक्क्यातून ते सावरलेले दिसत नाहीत. त्यामुळेच त्यांना गावगुंड आणि पंतप्रधानांमधील फरक कळत नाही. त्यांना उपचाराची जास्त गरज आहे.