हायलाइट्स:
- शिवसेनेचा जन्म हा १९६९ साली झाला, तर भाजपचा जन्म १९८० मध्ये झाला
- या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मापूर्वीच्या आहेत
तत्पूर्वी संजय राऊत यांनी मुंबईतील पत्रकारपरिषदेतही देवेंद्र फडणवीस यांचा चांगला समाचार घेतला. शिवसेनेपूर्वी भाजपने मुंबईत पहिला नगरसेवक निवडून आणला होता, या देवेंद्र फडणवीस यांच्या टिप्पणीलाही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. शिवसेनेचा जन्म हा १९६९ साली झाला, तर भाजपचा जन्म १९८० मध्ये झाला. त्याकाळात मुंबईत हेमचंद्र गुप्ते यांच्या रुपाने शिवसेनेचा पहिला महापौर निवडून आला होता. तसेच वामन महाडिक, प्रमोद नवलकर आणि छगन भुजबळ हे शिवसेनेचे आमदारही निवडून आले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस नागपूरात होते, त्यांचा मुंबईच काय महाराष्ट्राच्या राजकारणाशीही संबंध नव्हता. या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मापूर्वीच्या आहेत. त्यामुळे याविषयी माहिती नसेल तर शिवसेना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत त्यांच्यासाठी एक अभ्यास शिबीर ठेवेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.
‘बाबरी पतनावेळी मुंबईतूनही कारसेवक गेले होते’
बाबरी पतन आणि अयोध्येच्या लढ्यात शिवसेनेचा सहभाग नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा दावाही राऊत यांनी फेटाळून लावला. त्यावेळी सीबीआयच्या विशेष न्यायालयात लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही गुन्हा आणि खटला दाखल झाला होता. तेव्हा न्यायालय मूर्ख होतं का? त्याकाळात मुंबईतून उत्तर प्रदेशात शेकडो कारसेवक गेले होते. त्यांचा कोणताही पक्ष नव्हता. त्या काळातील सामना दैनिकाच्या रोजच्या अंकात कोण कुठून अयोध्येसाठी रवाना झाले आहे, याची माहिती प्रसिद्ध केली जात होती. मुंबईत वॉर रुम स्थापन करुन शिवसेना या सगळ्यावर नियंत्रण ठेवून होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी कितीही वेगळी माहिती प्रसवली तरी लोकांचा त्यावर विश्वास बसणार नाही. मध्यंतरी अयोध्या लढा थंड पडला तेव्हा उद्धव ठाकरे यांनीच अयोध्येत जाऊन वातावरण पुन्हा तापवले, असेही संजय राऊत यांनी म्हटले.