ठाणे न्यूज़ लाइव: ‘कायद्याचं राज्य आहे आयुक्त म्हणतील तसं चालणार नाही, भर कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांनी आयुक्तांना झापलं – the rule of law will not work as the commissioner says said by jitendra awhad
ठाणे : मिरा-भाईंदर शहरात काशिमिरा परिसरातील आरक्षण क्रमांक ३६४ मध्ये मीरा भाईंदर महानगर पालिकेकडून झोपड्यांवर कारवाई करण्यात आली. परिसरातील झोपडीधारकांनी याची तक्रार राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे केली. या संदर्भात मंत्री आव्हाड यांनी तत्काळ पालिकेचे उपयुक्त स्वप्नील सावंत यांना फोन करून त्यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी पुनर्वसन न करता कारवाई कशी केली असा प्रश्न उपस्थित करत. हे राज्य कायद्याचे आहे हिटलरशाही चालणार नाही असा दम उपायुक्त यांना फोनवरून दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड हे मीरा भाईंदर येथे आले असता त्यांनी महापालिकेच्या उपायुक्तांना चांगलेच झापले.
मीरा भाईंदर मधील काशीमीरा परिसरातील आरक्षण क्रमांक ३६४ या जागेवर असलेल्या अनेक झोपडपट्टीवर मीरा भाईंदर महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली. त्यानंतर या परिसरातील होप फाऊंडेशनचे अध्यक्ष साहिल मिश्रा यांच्या सहित २० ते २५ महिलांनी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची कार्यक्रमादरम्यान भेट घेऊन लेखी निवेदन दिले आणि आपल्या व्यथा आव्हाडांसमोर मांडल्या. या परिसरातील नागरिक हे १९९० ते १९९५ च्या काळापासून या जागेवर राहतात. मागील वीस ते पंचवीस वर्षापासून घरपट्टी देखील आम्ही भरली असून अचानकपणे बाजूला असलेल्या विकासकाच्या फायद्यासाठी आमच्यावर कारवाई केली असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी मंत्री आव्हाड यांना दिली. ‘ते’ ७ जण ७ कोटी रुपये किंमतीच्या २ हजाराच्या बनावट नोटा घेऊन जात होते; पोलिसांनी सापळा रचून पकडले
होप फाऊंडेशनच्या या लेखी निवेदनाची गंभीर दखल घेत आव्हाड यांनी तात्काळ पालिकेचे उपायुक्त स्वप्नील सावंत यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून चांगलाच समाचार घेतला. फोनवरून उपायुक्तांशी संवाद साधताना आव्हाड यांनी ही जागा पालिकेची असली तरी त्याच्या जागेवर गोरगरीब जनता राहत आहे. ९५ च्या अगोदरचे स्थानिक त्याठिकाणी आहेत तर त्यांना २६८ अन्वये नोटीस का दिली नाही? १५ दिवसांत कागदपत्रे सादर करण्यास का सांगितले नाही? असा सवाल यावेळी आव्हाड यांनी उपयुक्तांसमोर उभा केला. थेट बेधडक कारवाई कोणाच्या बोलण्यावर केली, जरी आयुक्तांचा आदेश असला तरी बेकायदेशीर आदेशाचे आपण पालन करणार का? असा जाब त्यांनी उपायुक्तांना विचारला. यापुढे त्या जागेवर राहणाऱ्या रहिवाशांच्या घरांवर जर बुलडोजर चढवला तर त्या जागेवर मी स्वतः येईल असा सज्जड दम मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला. अगोदर त्यांचे पुनर्वसन करा त्यांच्या हातात चाव्या द्या त्यानंतर झोपड्या तोडा अशी सूचना गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी उपायुक्त स्वप्नील सावंत यांना केली.