मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या पुढाकाराने मालाड येथील क्रीडा संकुल तयार करण्यात आले आहे. या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यात येणार असल्याचे फलक परिसरात लागले होते. त्याचवेळी अस्लम शेख यांनी या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यात काहीही गैर नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी क्रीडा संकुलाबाहेरील परिसरात आंदोलनही केले होते. आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. टिपू सुलतानच्या नावावरून भाजप लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. टिपू सुलतान ब्रिटिशांशी लढले. त्या काळी ते ब्रिटिशांशी लढताना शहीद झाले. ते ब्रिटिशांना कधीही शरण गेले नाहीत. ब्रिटिश साम्राज्याला त्यांनी त्याकाळी हादरवून सोडले होते, असे मलिक म्हणाले. याआधी २०१३ मध्ये भाजप नगरसेवकांनी अशाच प्रकारे टिपू सुलतानचे नाव देण्याची भूमिका घेतली होती, ही बाबही मलिक यांनी निदर्शनास आणून दिली.
वाद कशावरून?
मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा संकुलाला ‘वीर टिपू सुलतान क्रीडा संकुल’ असे नाव देण्यावरून हा वाद निर्माण झाला. काँग्रेसचे नेते तथा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून हे सर्व काम पूर्णत्वास येत आहे. याचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे फलक मालवणी परिसरात लावण्यात आले होते. त्यामुळे या परिसरात वातावरण तापायला सुरुवात झाली होती. टिपू सुलतानचे नाव क्रीडा संकुलाला देण्यास आमचा विरोध आहे. हे नामकरण त्वरित थांबविण्यात यावे, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली.