Aurangabad News New Controversy Over The Program Inaugurated By Aditya Thackeray | शहराचा सात-बारा शिवसेनेच्या नावावर आहे काय?; आदित्य ठाकरेंनी उद्घाटन केलेल्या कार्यक्रमावरून नवा वाद | Maharashtra Times
औरंगाबाद : शिवसेना-भाजप वाद काही नवीन नाहीत. मात्र त्यात आता आणखी भर पडली आहे ती म्हणजे, औरंगाबाद येथील खाम नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत विविध विकासकामांना देण्यात आलेल्या नावांची. शिवसेना नेत्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली नावे देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विशेष म्हणजे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात या उपक्रमांचे लोकार्पण करण्यात आले.
खाम नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत विविध विकासकामांना आदित्य सरोवर, चंद्रकांत योग लॉन, अंबादास फुलपाखरू उद्यान तर सुभाष ऑक्सिजन हब अशी नावे देण्यात आली आहे.त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली नावे देण्यात आल्याने भाजपने आक्षेप घेतला असून, प्रशासनाने जनतेच्या पैशातून वैयक्तिक कुणाला खूश करण्यासाठी असे प्रयत्न करणे योग्य नाही. या सगळ्या प्रकरणाची केंद्र शासनाकडे लेखी तक्रार तर करू. शिवाय अधिवेशनात देखील हा मुद्दा उचलून धरू, असा इशारा भाजप नेते आणि आमदार अतुल सावे यांनी दिला आहे. ST Strike Update : एसटी संप मिटला का? गुरुवारी राज्यात ८ हजार बसेस धावल्या, आता फक्त १० आगार बंद… शहराचा सात-बारा शिवसेनेच्या नावावर आहे काय?
या प्रकरणावर बोलताना भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांत शिवसेना मंत्री, नेते, लोकप्रतिनिधींची नावे देण्याची गरज काय आहे? शहराचा सात-बारा शिवसेनेच्या नावावर असल्याप्रमाणे हा प्रकार आहे. महापालिका, स्मार्ट सिटी, छावणी नगर परिषद या संस्थांचे यात योगदान आहे. शासनाच्या माझी वसुंधरा मोहिमेचा हातभार आहे. त्यामुळे अशा या हुजरेगिरीविरोधात भाजप आंदोलन करणार असल्याचा इशारा शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिला. त्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटलं असून, यावरून भविष्यात स्थानिक राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे.