देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिन नुकताच साजरा झाला. इतकी वर्षे उलटली तरी, देशाचं भविष्य असलेल्या मुलामुलींचा शिक्षणासाठीचा खडतर प्रवास या व्यवस्थेमुळे संपलेला नाही. याच भावनाशून्य व्यवस्थेमुळे जीवाचा धोका पत्करून शाळेची वाट धरणाऱ्या सातारा जिल्ह्यातील खिरखंडी गावातील मुलामुलींची व्यथा ‘मटा ऑनलाइन’नं नुकतीच व्हिडिओ आणि बातमीच्या माध्यमातून मांडली होती. त्याची दखल आता विविध स्तरांतून घेतली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या वृत्तांकनाची दखल घेत ट्विट केलं आहे. ‘करोनाच्या भीतीनं आपण मुलांना शाळेत पाठवायला घाबरतोय आणि साताऱ्यातील खिरखंडी गावातील विद्यार्थी होडीतून रोज कोयना धरण ओलांडत पुढे ४ किलोमीटर जंगलातून चालत हिंस्र प्राण्यांचाही सामना करत, जीवघेणा प्रवास करताहेत. शिक्षणासाठीची यांची ही तळमळ संवेदनाहीन सरकारच्या संवेदना जागवेल का..?’ असा सवाल त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला केला.
‘कोयनेचं पाणी आणि जंगली प्राणी दोघांशीही मैत्री झालीय, त्याशिवाय पर्यायच नाही’
विदारक परिस्थिती जगासमोर मांडली
सातारा जिल्हा हा महाराष्ट्रातील प्रगतीशील जिल्हा. पण याच जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थी सोईसुविधांपासून वंचित आहे. विद्यार्थ्यांना अजूनही शिक्षणासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. जावली तालुक्यात खिरखंडी या गावातील मुलामुलींना होडीनं प्रवास करून शाळा गाठावी लागते. लाकडाची होडी स्वत:च चालवून या मुलींना कोयना धरणाचा विशाल जलाशय पार करावा लागतो. हा त्यांचा रोजचाच दिनक्रम आहे. खिरखंडी हे गाव जावली तालुक्यातील व्याघ्र प्रकल्पात येते. या भागात सकाळी ९ वाजता शाळा सुरू होते. सकाळी ८ वाजता गावातील मुली शाळेची वाट धरतात. त्यांचा हा प्रवास होडीने सुरू होतो. मुली होडी चालवत कोयनेच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जातात. तिथं होडी थांबवून पुढे सुमारे ४ किलोमीटर पायी जावे लागते. काट्याकुट्यांतून आणि जंगलातून पायपीट करत दीड तासानंतर त्या अंधारी या गावात पोहोचतात, तेव्हा कुठे त्यांच्या शिक्षणाला सुरुवात होते. पण या सगळ्या परिस्थितीकडे स्थानिक प्रशासन आणि सरकारनं पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे.