शासनाच्या नव्या आदेशानुसार, करोना प्रतिबंधित लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांसाठी ऑनलाइन तिकीट विक्रीसह राष्ट्रीय उद्याने आणि इतर पर्यटनस्थळे खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हेअर सलूनप्रमाणे स्पा सेंटर्सदेखील ५० टक्के क्षमतेने सुरू करता येणार आहे.
लसीकरणास पात्र असलेल्या नागरिकांपैकी ९० टक्के नागरिकांचा पहिला डोस आणि किमान ७० टक्के नागरिकांचे दोन्ही डोस झालेल्या जिल्ह्यांना जास्त सूट देण्यात आली आहे. या यादीत समाविष्ट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बीच आणि उद्याने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसंच स्वीमिंग पूल आणि वॉटर पार्क यांना मात्र ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. रेस्टॉरंट, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहांनाही ५० टक्के क्षमतेची अट असणार आहे.
लग्न समारंभासाठी किती लोकांची अट?
करोना निर्बंध कडक करण्यात आल्यानंतर विवाह समारंभासाठी ५० लोकांची मर्यादा घालून देण्यात आली होती. आता मात्र समाधानकारक लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये कार्यालयाच्या २५ टक्के क्षमतेमध्ये किंवा जास्तीत जास्त २०० लोकांच्या उपस्थितीची अट ठेवण्यात आली आहे.