‘या अर्थसंकल्पात डिजिटल कार्यक्रमाच्या घोषणा जास्त करण्यात आल्या. तंत्रज्ञानाचा वापर सरकार करत असते. मात्र हा अर्थसंकल्प तंत्रज्ञानाच्या आधारावरच सादर होत असेल तर हा अर्थसंकल्प देशाचा की आयटी डिपार्टमेंटचा होता असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे,’ असा टोलाही मलिक यांनी लगावला.
मोदींना करून दिली आश्वासनाची आठवण
‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ असं आश्वासन दिलं होतं. मात्र आजच्या अर्थसंकल्पात तीन वर्षात ६० लाख लोकांना रोजगार देण्याचे सांगण्यात आले. म्हणजे मोदींची ती जुमलेबाजी होती का?’ असा बोचरा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असं आश्वासन देण्यात आलं होतं आणि आता शेतकर्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी काम करू सांगत आहेत, असंही ते म्हणाले.
दरम्यान, ‘देशातील सर्वात विश्वासार्हता असलेली कंपनी एलआयसी असून तिचा आयपीओ काढून विकण्याचा कार्यक्रम घोषित झाला आहे, म्हणजे संपत्ती विकून देश चालवायचा हा मोदींचा कार्यक्रम सुरूच राहणार आहे,’ असाही टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.