सचिन प्रकाश साळसकर (वय २९ रा. विरार), उमर फारूक (वय ३९, विरार), अनेक अनिल ओतारी (रा. विरार), मजहर मोहम्मद हुसेन खान (वय ४०, रा. विरार), हरिश्चंद्र काशिनाथ कडव (रा. वांगणी), नितीन दिलीप शेलार (वय ४०, रा. वांगणी) आणि अशोक बिहारीराम चौधरी (वय ५१, रा. महेश अपार्टमेंट, गोग्रासवाडी, नामदेव पथ, डोंबिवली-पूर्व) अशी या सात जणांची नावे आहेत. यातील सचिन साळसकर, उमर फारूक आणि अनेक ओतारी या तिघांना कल्याण कोर्टाने ६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित चौघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची रवानगी कल्याणच्या आधारवाडी तुरूंगात करण्यात आली आहे. या संदर्भात एचडीएफसीच्या कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या दावडीतील शाखेचे मॅनेजर विशाल रामप्रसाद व्यास (वय ४५) यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी ऑक्टोबर २०२१ रोजी गुन्हा दाखल केला होता.
सात जणांनी इंड्स टॉवर प्रा. लि. नामक कंपनीच्या नावाने २४ कोटी रुपयांची रक्कम नमूद असलेला बोगस धनादेश तयार केला. हा धनादेश १ ऑक्टोबर २०२१ रोजी एचडीएफसी बँकेच्या दावडी शाखेत सादर केला. विशेष म्हणजे त्या धनादेशावर असणाऱ्या सह्या तंतोतंत जुळत होत्या. मात्र धनादेशाची प्रिंट वेगळ्या शाईत असल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मॅनेजर विशाल व्यास यांना हा प्रकार संशयास्पद वाटला. त्यांनी या धनादेशावर संशोधन केले असता, हा धनादेश बोगस असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान पोलिसांनी तपास करून आतापर्यंत एकूण ७ आरोपींना अटक केली आहे.
विशेष म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, विरार पोलीस ठाण्याचे जमादार सुरेंद्र शिवदे, दीपक जगदाळे यांनी केलेल्या तपासात असेही निष्पन्न झाले आहे की, हे आरोपी टीम वर्कने काम करतात. यात खातेधारकांची बँकेची सर्व माहिती गोळा करणे, त्यात असणारी शिल्लक, खातेधारकाच्या सहीचे फोटो, वगैरे माहिती घेत असत. त्यानंतर त्या माहितीच्या आधारे बोगस धनादेश तयार करण्याचे काम करत होते. एक साधा धनादेश घेऊन त्यावरील खाते नंबर खोडून, नवीन खाते क्रमांक छापण्यात येत होते. जमवलेल्या माहितीच्या आधारे मग त्यावर बनावट सही केली जात होती. त्यानंतर हा धनादेश वापरून ‘अकाउंट टू अकाउंट पैसे पाठवले जात असत. पैसे ट्रान्सफर करून घेण्यासाठी देखील डमी अकाउंटचाच वापर केला जात असे. अशा प्रकारे आतापर्यंत या आरोपींनी ५० पेक्षा जास्त बोगस धनादेश तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या ७ जणांनी मिळून आतापर्यंत किती कंपन्या, बँका आणि व्यक्तींची अशा रितीने फसवणूक केली आहे, याचा तपास श्रीकृष्ण गोरे करत आहेत.