‘पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास आपण लढू’ असा पवित्रा नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी घेतला आहे. दोन वर्षातील पोटनिवडणुकीचा इतिहास पाहता मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता फारच कमी आहे. यामुळे ही लढत काँग्रेस आणि भाजपमध्येच होण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, माजी नगरसेवक सत्यजित कदम, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे आणि दौलत देसाई यांची नावे चर्चेत आहेत.
निवडणूक लढवण्याबाबत भाजपच्या काही प्रमुख नेत्यांची नुकतीच एक बैठक झाली. यामध्ये उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कदम यांच्या नावाला हिरवा कंदिल मिळाल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मतदारसंघातील सर्व नेत्यांच्या त्यांनी भेटीगाठी सुरू केल्याने त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे जयश्री जाधव आणि कदम यांच्यात सामना रंगणार आहे.
एप्रिल अथवा मे महिन्यात कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्याची रंगीत तालीम म्हणून भाजपने विधानसभा पोटनिवडणूक लढवावी असे निश्चित झाले आहे. पण, बिनविरोधाचा प्रस्ताव काँग्रेसकडून दिल्यानंतर राज्यपातळीवर काय घडामोडी होणार यालाही महत्त्व राहणार आहे. सध्याच्या राजकीय हालचाली पाहता बिनविरोधाची शक्यता फारच कमी वाटते. पण, विधानपरिषदेची निवडणूक शेवटच्या क्षणी बिनविरोध झाली होती. यामुळे विधानसभा पोटनिवडणुकीत काय होणार याची उत्सुकता वाढली आहे.