सुपर मार्केटमध्ये वाइन विक्री करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयावर टीका होत असून, बंडातात्या यांनी साताऱ्यात आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान बंडातात्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर राज्यातील महिला नेत्यांबद्दलही वादग्रस्त टिप्पणी केली होती. यावरून टीकेची धनी ठरलेल्या बंडातात्यांनी त्यांची माफी मागितली आहे.
महिला नेत्यांबाबत बंडातात्या कराडकर यांचं वादग्रस्त विधान; वाईनच्या निर्णयावर बोलताना जीभ घसरली
ज्या-ज्या व्यक्तींची मी नावे घेतली, त्यांच्याबद्दल माझ्या मनात कुठल्याही प्रकारचा आकस नाही. मी काही त्यांचा द्वेष करत नाही. राजकीय हेतूने कुणावरही आरोप किंवा टिप्पणी केलेली नाही. अनावधानानं हे वक्तव्य केलं गेलं. त्याबद्दल मी माफी मागत आहे, असे बंडातात्या यांनी सांगितलं. तत्पूर्वी, विनापरवानगी जमाव जमवणे आणि करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी बंडातात्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साताऱ्यात गुन्हा दाखल, पोलीस काय म्हणाले?
बंडातात्यांनी विनापरवानगी केलेल्या आंदोलन प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीररित्या जमाव जमवणे, करोनासंबंधी नियमांचे उल्लंघन अशा विविध प्रकरणांत त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विनापरवानगी आंदोलन कुणी करत असेल, तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल. न्याय मागण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. मात्र, बंडातात्यांनी केलेल्या मोर्चाला कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. विनापरवानगी त्यांनी ८० ते ९० लोकं जमवून मोर्चा काढला. त्या अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. महिला नेत्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणात कुणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली तर, त्यासंदर्भातही गुन्हा नोंदवण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले.