करोनावर औषध किंवा लस शोधण्यासाठी कुठल्याही देशाला किमान एक वर्षाचा कालावधी लागेल. यामुळे करोनावर मात करायची असेल तर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणं हाच सध्यातरी एकमेव उपाय आहे, असं सीसीएमबीचे संचालक राकेश मिश्रा यांनी सांगितलं.
सीसीएमबीमध्ये करोनावर संशोधन सुरू
आम्ही करोना व्हायरसवर संशोधन सुरू केले आहे. प्रयोगशाळेत या व्हायरसची उत्पत्ती करण्यात येत आहे. यामुळे सीरम तपासणीसाठी त्याचा उपयोग करता येईल. दुसरीकडे करोना व्हायरसच्या नमुन्यांचीही तपासणी करण्यात येत आहेत. एका दिवसात शेकडो नमुन्यांची चाचणी आता सीसीएमबीमध्ये करता येणार आहे, अशी माहिती मिश्रा यांनी दिली.
देशातील करोनाच्या रुग्णांची संख्या कमी होण्याची कुठलीही चिन्ह नाहीएत. रुग्ण संख्या आणखी वाढणार आहे. आपला देशात घोषित झालेला लॉकडाऊन किती यशस्वी ठरला हे या रुग्णसंख्यवरून निश्चित होणार आहे. चीनने नागरिकांच्या हालचालीच बंद केल्याने करोनावर त्यांना मात करता आली. आता भारतात नागरिकांवर ही जबाबदारी आहे. करोनाची तपासणी करण्याची क्षमता भारताला आणखी वाढवण्याची गरज आहे. यामुळे करोनावर काही अंशी नियंत्रण मिळवता येऊ शकेल, असं राकेश मिश्रा म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times