शिर्डी लोकसभा मतदारसंघात या निर्णयाची अंमलबजावणी होऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला आहे. त्यानंतर आता संगमनेरच्या किराणा दुकानदारांची ही भूमिका समोर आली आहे.
संगमनेर किराणा असोसिएशनचे श्रीगोपाल रामनाथ पडताणी, पदाधिकारी जगदीश बद्दर, नितीन गुंजाळ, मुकेश कोठारी, शरद गांडोळे यांनी संगमनेरच्या तहसीलदारांना यासंबंधी निवेदन दिले आहे. त्याच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
या निवेदनात म्हटलं आहे की, राज्य सरकारचा वाईन म्हणजे दारूसंबंधी झालेला निर्णय अत्यंत दुर्दैवी, समाजघातक, राष्ट्रघातक, नीतीमतेच्या शिलाचा संहार करणारा आहे. उगवत्या पिढीला नितीमत्ता, शील व संस्कृती यापासून भरकटत विनाशाच्या दिशेने नेणारा निर्णय आहे. हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराज व संतांच्या पवित्र भूमीचा इतिहास व परंपरा असलेल्या महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट’ बनवू नका. या निर्णयासंबंघी आमच्या भावना तीव्र आहेत. या भावना सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही किराणा व्यापारी असोसिएशन व सर्व सदस्य या निर्णयाचा तीव्र शब्दांत धिक्कार करतो, असंही निवेदनात म्हटलं आहे.