: ‘शासकीय काम सहा महिने थांब’ असं म्हटलं जातं. ते काही खोटं नाही. याचा अनुभव चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आला. एक नाही दोन नाही तब्बल पन्नास वर्षापासून 11 शेतकऱ्यांना रस्त्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. आता मात्र शेतकऱ्यांनी कठोर भूमिका घेत नव्याने सुरू असलेल्या रस्त्याचे काम बंद पाडले.
सन 1972 पूर्वी धाबा-पोडसा या मार्गाच्या कामाला सुरुवात झाली. मार्गालगत असलेल्या शेतजमिनी मार्गात गेल्या. जमिनीचा मोबदला देऊ असं प्रशासनानं सांगितलं. मात्र पन्नास वर्ष उलटले तरी मोबदल्याच्या नावावर शेतकऱ्यांचे हात रिकामेच आहे. जमिनीचा मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयात चकरा मारल्या. आमदार,खासदार मंत्र्यांना निवेदन दिली. मात्र फाईलवर साचलेली साधी धूळही उडालेली नाही.
आता नव्याने धाबा-पोडसा या मार्गाचे काम सुरु झालंय. पहिल्यांदा आमच्या जमिनीचा मोबदला द्या, मगच कामाला सुरुवात करा, अशी कठोर भूमिका घेत शेतकर्यांनी रस्त्याचं काम बंद पाडलं. जोपर्यंत मोबदला मिळणार नाही, तोपर्यंत काम करु देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.