मुंबई- भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (lata mangeshkar) यांचे आज मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात सकाळी ८.१२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या २८ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. लतादीदींच्या निधनाने संपूर्ण देशातून शोक व्यक्त होत आहे.

लता मंगेशकर यांनी भारतीय संगीत विश्वामध्ये अढळपद निर्माण केले आहे. लतादीदींनी अनेक गायकांसोबत गाणी गायली. परंतु त्यामध्ये मोहम्मद रफी यांच्याबरोबर त्यांनी गायलेली गाणी खूपच लोकप्रिय झाली. या दोघांनी गायलेल्या गाण्यांची जादू आजही श्रोत्यांवर कायम आहे. अशा या दोन महान गायकांमध्ये एका गोष्टीवरून मोठे भांडण झाले होते. दोघांमधील हे भांडण इतके टोकाला गेले होते की, त्यांनी एकमेकांसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला होता. लतादीदी आणि रफी साहेब यांच्यातील भांडण त्याकाळात चर्चेचा विषय ठरले होते.

पाकिस्तानी पत्रकाराला लता दीदींनी नेलं होतं देवघरात, सांगितलेलं कसं पडलं मंगेशकर आडनाव

लता मंगेशकर

काय होतं भांडणाचं कारण

मोहम्मद रफी यांची सून यास्मीन खालिद यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींचा उलगडा Mohammed Rafi: My Abba – A Memoir या पुस्तकात केला आहे. लता दीदींसोबतच्या भांडणाबद्दल त्यांनी लिहिले की, ‘१९६० च्या सुरुवातीला या दोघांमध्ये भांडण झाले. हे भांडण झाल्यानंतर या दोघांनी एकमेकांबरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात लोकप्रिय असलेल्या या दोन महान गायकांनी तीन वर्षे एकमेकांसोबत काम केले नाही.’

लता मंगेशकरांना आई स्थानी मानायचा सचिन तेंडुलकर, मास्टर ब्लास्टरसाठी गायलेलं एक सुरेख गाणं

यास्मिनने त्यांच्या पुस्तकात नमूद केले की, ‘या दोघांमध्ये जे भांडण झाले ते रॉयल्टीवरून झाले. दोघांनी जी गाणी एकत्र गायली होती त्यांची रॉयल्टी लता मंगेशकर यांना हवी होती. त्यांनी ही गोष्ट निर्मात्यांपुढे ठेवली. लतादीदींची इच्छा होती की मोहम्मद रफी यांनी त्यांना पाठिंबा द्यावा. परंतु रफी यांना ही गोष्ट मान्य नव्हती. रफी साहेबांच्या मते निर्माते जेव्हा गायकांना गाण्याचे पैसे देतात तेव्हा त्यांच्याकडून रॉयल्टी मागणे योग्य नाही.’

लता मंगेशकर

लतादीदींबरोबर काम न करण्याचा घेतला निर्णय

या गोष्टीवरून लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्यात वाद झाला. यासंदर्भात लता मंगेशकर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘रफीसाहेब म्हणाले होते, ‘मी लताबरोबर गाणे गाणार नाही.’ मी या गोष्टीला विरोध केला. त्यांना म्हटले की, ‘रफीसाहेब एक मिनीट तुम्ही जे म्हणतात ते चुकीचे आहे. मलाच तुमच्याबरोबर गायचे नाही.’ मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहिद रफी यांनी देखील एका मुलाखतीमध्ये सांगितले की, या दोघांमध्ये निर्माण झालेला दुरावा मिटवण्याचे काम संगीतकार जयकिशन यांनी केले. त्यांच्यामुळेच या दोघांमध्ये पुन्हा मैत्रीचे नाते निर्माण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here