>> अनिरुद्ध भातखंडे
२८ सप्टेंबर १९२९.

इंदूरच्या शीख मोहल्ल्यातील एका घरात मास्टर दीनानाथ मंगेशकर व शुद्धमती ऊर्फ माई मंगेशकर यांना कन्यारत्न झालं. त्यांचं ते पहिलंच अपत्य.

लता दीनानाथ मंगेशकर!

मा. दीनानाथ त्यावेळी पैसा, प्रसिद्धी, ऐश्वर्य, मानसन्मान याच्या शिखरावर होते. सांगलीमध्ये तब्बल १३ खोल्यांचं भव्य घर होतं. घरात रोज बारा शेर दूध येत असे. रोज पाच-पंचवीस जण जेवणासाठी सहज असत. मात्र या ऐश्वर्याला उतरती कळा लागली. दीनानाथ खचले. २४ एप्रिल १९४२ या दिवशी वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी पत्नी व पाच मुलांना मागे सोडून दीनानाथ गेले. दीनानाथ गेल्यानंतर तासाभरातच लताने आपल्या आईला प्रश्न विचारला, आता मला नोकरी करावी लागेल का… १३ वर्षांची लता एकाएकी मोठी झाली होती.

दीनानाथांचे स्नेही मास्टर विनायक यांनी लताला आपल्या नवयुग पिक्चर्स या संस्थेत संधी दिली. पुढे त्यांनी प्रफुल्ल पिक्चर्सची स्थापना केली व त्यात नोकरी करण्यासाठी लता सहकुटुंब कोल्हापूरला रवाना झाली. लताला आवड होती ती गाण्याची, मात्र कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अभिनय करावा लागत होता. परंतु गाणंच तिचं जणू प्राक्तन होतं, त्यामुळे मा. विनायक यांच्या मृत्यूनंतर, १९४७मध्ये लताने मुंबईत पार्श्वगायनाच्या क्षेत्रात प्रवेश केला.

हिंदी चित्रपटसंगीत त्यावेळी प्राथमिक स्थितीत होतं. तेव्हाच्या बहुतांश गायिकाही मर्दानी आवाजात गात असत. त्यामुळे मराठमोळ्या लताचा पातळ स्वर अनेकांना खटकला. कोणीही गॉडफादर नसणाऱ्या १७-१८ वर्षांच्या ही मुलगी संघर्ष व परिश्रम करण्यासाठी सिद्ध झाली. दिलीपकुमारने उर्दू उच्चारांवर टिप्पणी करताच ती रडत बसली नाही. तिने दुसऱ्या दिवशी उर्दुची शिकवणी लावली व त्या भाषेवर प्रभुत्व मिळवलं.

मा. गुलाम हैदर, अनिल विश्वास, नौशाद आदी संगीतकारांनी लताची थोरवी जाणली. ही मुलगी इतिहास घडवेल याची त्यांना खात्री पटली. बदलते संगीतप्रवाह व लताचं पदार्पण असा सुंदर योग जुळून आला. लताच्या गोड गळ्यात गंधार होताच. शिवाय तिची स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती अत्युच्च होती. तिला कोणत्याही सप्तकाचं वावडं नव्हतं. संगीतकारांचं काम फारच सोपं झालं होतं. ते मुक्तपणे संगीतरचना करू लागले. त्या उत्तमोत्तम रचनांना लता न्याय देत गेली. महल, अंदाज, बरसात… चित्रपटांची रांगच लागली. विसाव्या शतकाचा पूर्वार्ध संपताना लतायुग सुरू झालं होतं!

सी. रामचंद्र, शंकर-जयकिशन, मदनमोहन, सलील चौधरी, रोशन, सचिनदेव बर्मन आदी संगीतकारांची ती प्रेरणास्थान ठरली. लक्ष्मीकांत-प्यारेलाल, राहुलदेव बर्मन या संगीतकारांचं तिच्याशिवाय पान हलत नव्हतं. सर्वजण लतासाठी आग्रही होते. असं काय विशेष होतं त्या गळ्यात? स्वरमाधुर्य होतंच. परंतु तो स्वर कमालीचा सात्त्विक होता. पातळ तरीही दाणेदार आवाज ध्वनिमुद्रणासाठी अगदी अनुरूप होता. शब्दोच्चार स्वच्छ व स्पष्ट होते. (ऐका, श्रावणात घननिळामधील श्रचा उच्चार) शिकायची व परिश्रम घेण्याची तयारी होती.

नायिकांच्या पिढ्या बदलल्या, नवनवे संगीतकार येत गेले, सहगायक बदलत राहिले…लता मात्र अढळपदावर कायम होती. मै सोलह बरस की, तू सतरा बरस का असं गाणारी लता तेव्हा प्रत्यक्षात ५० वर्षांची होती. तरीही तिच्या स्वरातील लाडिकपणा कायम होता. तिच्यावर मक्तेदारीचे आरोप झाले. तिने दुर्लक्ष केलं. निर्माता-दिग्दर्शक, नायिका, संगीतकार सर्वांना लताच हवी असेल तर मक्तेदारीचा प्रश्न येतोच कुठे? हिंदी चित्रपटसृष्टी ही खरं तर नायकप्रधान. नायिकांच्या वाट्याला येणारे प्रसंग व गाणी तशी कमीच. त्यात पार्श्वगायन हा पडद्यामागचा प्रकार. तरीही एवढे महात्म्य लाभावे यातच तिचा मोठेपणा अधोरेखित होतो. मोहम्मद रफी, किशोरकुमार, आशा भोसले हे सारे दिग्गज गायक तिचे समकालीन. हे सर्वजण कमालीचे प्रतिभासंपन्न. मात्र या सर्वांमध्ये अत्युच्च स्थानी होती ती लताच.

हिंदीमध्ये व्यग्र असल्याने मराठी गाण्यांसाठी ती फार वेळ देऊ शकली नसावी. तरीही वसंत प्रभू, श्रीनिवास खळे, पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत दिग्दर्शनात तिने गायलेली मराठी भावगीतं कालातीत आहेत. लताचा विशुद्ध सुरेल स्वर्गीय स्वर अनुभवायचा असेल तर ‘अभंग तुकयाचे’मधील रचना ऐकाव्यात. लता चालतीबोलती अख्यायिका ठरली, जिवंत दंतकथा झाली. जगात आपल्या देशाची ओळख होऊन राहिली. तिचा अवीट गोडीचा स्वर आसमंतात भरला आहे. या सृष्टीच्या अंतापर्यंत तो तसाच अढळ असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here