नगर-दौंड महामार्गावर नगर तालुक्यातील खडकी शिवारात आठ दिवसांपासून अपघाताची मालिका सुरू आहे. या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या महामार्गाचं काम झालं आहे. मात्र, तेथे गॅसची पाईपलाइन टाकण्याचं दुसऱ्या एका कंपनीचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्ता खोदण्यात आला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम होत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने शुक्रवारी हे आंदोलन केले. तेथे काम करणार्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधून ठेवले. शिवसेनेचे नेते संदेश कार्ले आणि बाळासाहेब हराळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
हराळ यांनी सांगितलं की, या संबंधी अनेकदा मागणी करून संबंधित अधिकाऱ्यांना भेटून तक्रार करूनही उपयोग होत नाही. अतिशय असुरक्षित वातावरणात हे काम सुरू आहे. त्यामुळे अपघात वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आम्हाला नाइलाजास्तव हे आंदोलन करावे लागत आहे. याबद्दल आमच्याविरूद्ध गुन्हेही दाखल केले जातील. मात्र, शिवसेना अशा गुन्ह्यांना घाबरत नाही. कामचुकार आणि लोकांचे जीव घेणाऱ्यांना आम्ही धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. आता तरी संबंधितांनी याची दखल घेऊन योग्य ती दक्षता घेऊन वेळेत काम पूर्ण करावे, मृतांच्या वारसांना आणि जखमींनी नुकसान भरपाई द्यावी, याला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांविरूद्ध सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करावेत, अशा मागण्या कार्ले यांनी केल्या आहेत.