बदलापूर शहरात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची मूळच्या पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या आरोपी तरुणाशी तो केरळमधील सिमेंट कंपनीत कामाला असताना फ्री फायर मोबाइल गेमच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन गेल्या २ वर्षांपासून दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. दोघेही वांरवार मोबाइलवरून गप्पा मारत होते. तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरूणाने अपहरण केले.
पीडित मुलीचे ८ फेब्रुवारीला अपहरण झाल्याची तक्रार नातेवाइकांनी बदलापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या घटनेचे गांभीर्य ओळखून बदलापूर पोलीस व उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने संमातर तपास सुरू केला असता उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक कैलास इंगळे, ज्ञानेश्वर महाजन, पाटील, रमेश केंजळे, गोणश गावडे, संजय शेरमाळे या पथकाला अपहरणकर्त्या संशयित व्यक्तीची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्याचा मोबाइल नंबर मिळवून लोकेशनवरून तांत्रिक माहिती मिळवली. त्यानंतर आरोपी तरुण ८ फेब्रुवारीला दुपारी कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडित तरुणीसोबत दिसून आल्याचे स्पष्ट झाले. पीडित मुलीला त्याने कल्याण येथे बोलावून तिचे अपहरण केल्याचे समोर आले.
पीडित मुलीला आरोपी तरुण कल्याण स्थानकात घेऊन जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला होता. तसेच त्याच्या मोबाइल नंबरच्या आधारे रेल्वे तिकीटचा तक्ता पाहून पीएनआर नंबरद्वारे रेल्वे रिझर्व्हेशनची तपासणी केली असता, कर्मभूमी एक्सप्रेसमधून पीडितेला घेऊन पश्चिम बंगालमध्ये गेल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने हावडा येथील डानकुणी रेल्वे स्थनकातील आरपीएफ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना गुन्ह्याची माहिती दिली. तसेच पीडित व अपहरण करणाऱ्या आरोपीचे फोटो पाठवून ते कोणत्या डब्यातून प्रवास करीत आहेत, त्याचीही माहिती दिली. रेल्वे पोलिसांनी आरोपीचे तिकट आणि पीएनआर नंबर पाहून तसेच त्याचे फोटो पाहून डानकुणी रेल्वे स्थनकातच कर्मभूमी एक्स्प्रेसमधून दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेचे पथक व पीडित मुलीचे नातेवाइक पश्चिम बंगालच्या डानकुणी रेल्वे स्थानकात पोहोचल्यावर आरोपीला अटक केली. त्याच्या तावडीतून पीडित मुलीची सुखरुप सुटका करून तिला नातेवाइकांच्या ताब्यात दिले.