राहुल गांधी यांच्याबाबत हिमंत बिस्वा सरमांनी केलेल्या वक्तव्याचा पटोले यांनी निषेध केला. हिमंत बिस्वा सरमा यांचे वक्तव्य अत्यंत अश्लाघ्य व सर्व मर्यादा पार करणारे आहे. राहुल गांधी यांच्याबद्दल त्यांनी काढलेले वक्तव्य हे त्यांची पातळी दाखवून देणारे आहे. भाजपतील वरिष्ठ नेत्यांपासून अनेक नेत्यांना विरोधकांवर अशी वैयक्तिक टीका करून त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा रोग जडला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्याबद्दलही हीन दर्जाचा शब्दप्रयोग भाजप नेत्यांनी वारंवार केला आहे. त्यांची हीच संस्कृती आहे. मात्र काँग्रेसची ही संस्कृती नाही. सरमा या आजारातून बरे होवोत, अशी आमची सदिच्छा आहे. त्यांनी चांगल्या डॉक्टरकडे उपचार घ्यावेत. त्यांचा सर्व खर्च काँग्रेस पक्ष करेल, असा टोलाही पटोले यांनी लगावला.
लोकशाहीमध्ये सरकारला जाब विचारण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आहे. त्यामुळे एक जबाबदार विरोधी पक्ष या नात्याने राहुल गांधी यांनी सरकारला जाब विचारला. भाजपने त्यावर आकांडतांडव करण्याची काही गरज नाही; परंतु भाजप हा लोकशाही व संविधानाला मानत नाही. भाजपचे नेते हीन पातळीवरून विरोधकांना बदनाम करण्याचे काम करत असतात. सरमा हे मुख्यमंत्री आहेत, बोलताना काही ताळतंत्र बाळगण्याची आवश्यकता असते, मात्र त्यांच्यावरचे संस्कारच तसे आहेत, त्यामुळे देव त्यांना सद्बुद्धी देवो, हीच आमची सदिच्छा आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले.