म. टा. वृत्तसेवा, चिपळूण
करोनाच्या भीतीने मुंबई लॉकडाऊन झाल्याने गिरगाव आणि दिवा येथे राहणारे ७३ जण जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावरून चालत कोकणातील आपल्या गावाकडे येत होते. या सर्वांना खेडनजीक दिवाणखावटी येथे ताब्यात घेण्यात आले. त्यांना खेडमधील गोळीबार मैदानातील बंदिस्त क्रीडांगनातील विलगीकरण कक्षात ठेण्यात आले आहे.
तीन दिवस सलग प्रवास करून हे नागरिक चौथ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीवर पोहोचल्यावर त्यांना करोना भरारी पथकाने विविध ठिकाणांहून ताब्यात घेतले. दिवाणखवटी रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी रात्री २६ आणि गुरुवारी सकाळी १३ जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच तुळशी चेकपोस्टनजीक १५, चाकाळे येथे आठ, भारणेनाका चेकपोस्टवर ११ अशा एकूण ७३ जणांना ताब्यात घेत सध्या खेड येथे विलगीकरणात ठेवण्यात आले असल्याचे पोलिस अधिकारी गुरव यांनी सांगितले.
या सर्वांनी मुंबई ते खेड हा प्रवास पायीच केला. त्यांनी खाण्याचे सामान सोबत आणले होते. तसेच वाटेत नागरिकांकडून खाण्याचे जिन्नस मिळवले होते. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर परिसरात त्यांचे गाव आहे. कामधंदा बंद पडल्याने भीतीपोटी त्यांनी गावची वाट धरली होती.
जिल्ह्यातील चाकरमानी बहुसंख्येने मुंबई, पुण्यात नोकरीला जातात. तीन दिवसांपूर्वी चिपळूणनजीक कुंभारली घाटातही २५० जणांना अडवून पोलिसांनी परत पाठवले होते. घाटातील चोरवाटेने काहीजण कोकणात येत असताना या सर्वांना ताब्यात घेण्यात आले. पुण्यात कसेबसे आठ दिवस काढल्याने ही मंडळी कोकणातील आपल्या गावाकडे परतत होती. दरम्यान, कोकणातील अनेक गावांनी सीमा बंद करून बाहेरील व्यक्तींना प्रवेशास मनाई केली आहे. त्यामुळे चाकरमान्यांनी गावाकडे येण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हा पोलिसप्रमुख प्रवीण मुंडे यांनी केले आहे.
…
पाळणा हललाच नाही
वर्षानुवर्षांच्या परंपरेला छेद देत गुरुवारी कोकणातील अनेक राममंदिरांत रामजन्मोत्सवाचा पाळणा हललाच नाही, तर पालख्याही सजल्या नाहीत. करोनामुळे धार्मिक कार्याला गर्दी करण्यास बंदी असल्याने चिपळूणच्या राममंदिरात होणारी पालखीची मिरवणूक रद्द झाली, तर रत्नागिरीत जागोजागी होणारे रामजन्मोत्सवाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले. या शिवाय जागोजागी होणारी कीर्तने, श्रीरामाची पालखी फिरवून प्रसादाचा सुंठवडा वाटला गेला नाही.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines