मुंबई: राज्य सरकारच्या वाईन विक्रीसंदर्भातील निर्णयावरून आंदोलनाचा इशारा देणारे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून निशाणा साधण्यात आला आहे. काँग्रेसचे राज्य दिल्लीत व महाराष्ट्रात असताना अण्णा ऊठसूट उपोषणे व आंदोलने करीत. पण आता अण्णा हजारे (Anna Hazare) भाजपचीच भाषा बोलतात, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली. अण्णांचे वैफल्य हे आहे की, अण्णांच्या प्रत्येक आंदोलनातली हवा निघून गेली आहे व मोदी-शहांचे सरकार केंद्रात आल्यापासून त्यांना कोणी फारसे विचारत नाही. रामलीला मैदान, जंतर मंतरवर त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकले, त्या रणशिंगात हवा फुंकणारे आज दिल्लीतील सत्ताधीश आहेत, पण ज्या ‘लोकपाल’साठी अण्णांनी लढाई केली तो लोकपाल आज गुजरात राज्यातही नेमला गेला नाही, दिल्ली तो बहोत दूर है! ”मी इतका मर मर मेलो, उपोषणे केली, पण कर्मदरिद्री भाजपवाले एक लोकपाल नेमायला तयार नाहीत. आता जगायचे कशाला?” असा त्रागा खरे तर अण्णांनी करायला हवा होता, असा सणसणीत टोला अण्णा हजारे यांना ‘सामना’तील अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
किमान महाराष्ट्रात तरी लोकशाही येईल; अण्णा हजारेंचं मोठं विधान
अण्णा हजारे यांचे मोठेपण महाराष्ट्रामुळे आहे. अण्णांनी राज्यात जलसंधारण, ग्राम सुधारणेची कामे केली. त्याची तोडीची कामे बाजूच्या पोपटराव पवार यांनी केली. त्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण त्यांनी कधी महाराष्ट्रात जगायची इच्छा नाही, असे म्हटले नाही. उलट महाराष्ट्रा जन्मास येण्यास भाग्य लागते. ज्यांना महाराष्ट्रात जगायची इच्छा नाही ते कर्मदरिद्रीच म्हणायला हवेत. वाईन विक्रीसंदर्भातील निर्णयानंतर अण्णा हजारे महाराष्ट्रावर कसल्या गुळण्या टाकत आहेत आणि कोणाच्या प्रेरणेने टाकत आहेत, हे त्यांनाच माहिती आहे. अण्णा म्हणतात मला जगायचे नाही. वयाची ८४ वर्षे झाली, खूप झाली. मी जगून घेतले. म्हणजे ते खूप जगून घेतल्याचा आनंद व्यक्त करत आहेत. राळेगणच्या यादवबाबाने तुम्हाला जेवढे आयुष्य दिले तेवढे तर जगावेच लागेल. पण त्यासाठी महाराष्ट्राची बदनामी का करता, असा सवाल अण्णा हजारे यांना विचारण्यात आला आहे.
ठाकरे सरकारवर अण्णा हजारे भडकले; आता दिला अखेरचा आक्रमक इशारा

‘अण्णा तुम्ही सैनिक, मग चिनी सैन्य भारतात घुसखोरी करते तेव्हा बोलत का नाही?’

अण्णा हजारे सैन्यातून निवृत्त झालेले सोल्जर आहेत. त्यामुळे अधुनमधून ते देशभक्तीचा बाणा दाखवत असतात. चिनी सैन्य लडाखमध्ये घुसले आहे व मोदी सरकार हतबलतेने पाहत आहे. ही हतबलता पाहून अण्णांमधला राष्ट्रभक्त जवान जागा होईल व केंद्र सरकारला सवाल विचारेल, असे वाटले होते. ज्या देशाच्या सीमा दुश्मनांनी पार केल्या ते पाहून जगावेसे वाटत नाही, असं खरंतर अण्णांनी म्हणायला हवं होतं. पुलवामात आपले ४० जवान सरकारच्या बेपर्वाईमुळे शहीद झाले. तेव्हाही अण्णांना आता जगायचे कशाला असा प्रश्न पडला नाही. करोना काळात गंगेत हजारो प्रेते वाहून जाताना जगाने पाहिली. मनुष्य हळहळला, पण गंगेतील प्रेतं पाहूनही अण्णा हजारे यांना नैराश्य आले नाही व आता जगायचे कशाला हा पांचट प्रश्न पडला नाही. दोनेक दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला. पण अण्णांनी हा अपमान गिळला व वाईन वाईनचा गजर करत आता जगणे नाही, असा सूर लावला, अशी खोचक टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here