गुहागर तालुक्यातील वेळंब नालेवाडी येथे सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. दोन दुचाकींची जोरदार धडक झाली. या अपघातात जयराम बाबाजी नर्बेकर (वय ५२) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धडक देणाऱ्या अन्य दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चिपळूण येथे उपचार सुरू आहेत. स्पोर्ट्स बाईक व दुचाकीत ही जोरदार धडक झाली. या धडकेत दोन्ही दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर जोराने आदळले. यात जयराम नर्बेकर यांच्या डोक्याला मार लागला आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. तर स्पोर्ट्स बाइकवरील बासीत दाऊद चिपळूणकर आणि साईक हानिफ तवसाळकर (दोघेही राहणार – पडवे) हे गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी असलेल्या बासीत चिपळूणकर आणि साईक तवसाळकर यांच्यावर चिपळूण येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर सहा वाहनांचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू
जयराम नर्बेकर (वय ५२) हे जानवळे ओझरवाडी, ता. गुहागर येथे राहतात. नर्बेकर हे सामाजिक कार्यकर्ते असून ते विवाह उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष होते. ते त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी वेळंब येथे गेले होते. गजानन नांदलस्कर यांच्या घरी दुचाकीवरून ते आले होते. बहिणीची भेट घेऊन ते दुचाकीवरुन जानवळे शृंगारतळीच्या दिशेने जाण्यास निघाले. याच दरम्यान आबलोलीकडून शृंगारतळीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या दुचाकीने जयराम नर्बेकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच गुहागरचे प्रभारी पोलीस निरीक्षक बी. के. जाधव त्यांच्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. या अपघाताची माहिती अजय नामदेव नर्बेकर, (वय ३३, रा. सतीचा माळ, वेळंब रस्ता, ता. गुहागर) यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली. बासीत आणि साईक हानिफ तवसाळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times