औरंगाबाद : शवविच्छेदन गृहाकडे जाण्याचा रस्ताच नसल्याने रस्त्याअभावी चक्क नातेवाइकांना मृतदेह खांद्यावर घेवून शवविच्छेदन गृहाकडे घेवून जावा लागल्याचा खळबळजनक प्रकार औरंगाबादच्या सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उघडकीस आला आहे. एवढंच नाही तर नातेवाईकांवर रात्रभर मृतदेह रस्त्याच्या कडेला ठेवण्याची वेळ आल्याचं सुद्धा समोर आलं आहे. विशेष म्हणजे सोयगाव हा महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघाचा भाग आहे.
अधिक माहिती अशी की, फर्दापूरला आत्महत्या केलेल्या एका तरुणाचा मृतदेह रविवारी रात्री सोयगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. परंतु आरोग्य विभागाच्या नियमानुसार रात्रीच्या अंधारात शवविच्छेदन होत नसल्याने या मृतदेहावर सोमवारी सकाळीच शवविच्छेदन करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला. परंतु, सोयगाव ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाची खिडक्या, दरवाजे पडक्या अवस्थेत असल्याने हा मृतदेह ठेवावा कसा असाही प्रश्न उपस्थित झाल्याने अखेरीस सोयगाव कोविड केंद्राजवळील रस्त्याच्या कडेला हा मृतदेह ठेवण्यात आला. धक्कादायक! भंगाराच्या दुकानात असं काही सापडलं की नागपूर प्रशासन हादरलं, पोलीसही हैराण तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा शवविच्छेदन गृहाकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने सोमवारी हा मृतदेह चक्क नातेवाईकांना खांद्यावर उचलून शवविच्छेदन गृहाकडे आणावा लागला होता. सोयगाव ग्रामीण रुग्णालयाकडे जाण्यासाठी रुग्णवाहिकेला सुद्धा रस्ता नाही, पायी जाणाऱ्यांना रस्त्यावर असलेल्या काट्यातून व कुपातीतून वाट काढावी लागते. त्यामुळे नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे.
सर्जनही उपलब्ध नाही…
तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सोयगाव ग्रामीण रुग्णालयावर अनेक गावांचा भार आहे. त्यामुळे याच रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणले जातात. पण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी सर्जन नसल्याने अजिंठ्यावरून सर्जन बोलवावा लागतो. तेही अनेकदा वेळवर लवकर उपस्थित होत नाही. त्यामुळे अनेक दिवसांपासून लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.